no images were found
गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा: प्रकाश आबिटकर
मुंबई, – एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करावा अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या घरांबाबत मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांचेसह म्हाडा, नगर विकास विभागाचे अधिकारी, व कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले शासनाने गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे अनेक गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचे घर मिळाल आहे. उर्वरित गिरणी कामगारांनाही लवकर घरे मिळावीत, एकही गिरणी कामगार घरापासून वंचित राहू नये. सेंच्युरी, NTC व इतर गिरण्यातील कामगारांनाही लवकर घरे मिळावित यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून काम गतीने करण्यावर भर द्यावा अशा सूचना दिल्या.
ज्या गिरणी कामगारांनी शेलू (कर्जत) आणि कारव (ठाणे) येथील गृह प्रकल्पात संमती दिली आहे त्याची पुन्हा एकदा खात्री करावी. गिरणी कामगारांच्या पात्रता यादीत चुकीचे लाभार्थी येवू नयेत यासाठी संमतीपत्रांची पुन्हा पडताळणी करावी. संबंधित विभागांना प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आणि गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने व समन्वयाने काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले.