no images were found
स्वावलंबी राष्ट्र उभारणीचा संकल्प करूया – रविंद्र चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली “आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान” देशभर सुरू होत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती (२५ सप्टेंबर) ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जयंती (२५ डिसेंबर) या काळात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयाला स्वदेशी संकल्पाशी जोडणे, लोकसहभागातून राष्ट्रनिर्मितीला गती देणे आणि “वोकल फॉर लोकल” चा संदेश घराघरात पोहोचवणे असल्याचे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत केले. “नमो रमो” या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गरबा कार्यक्रमस्थळी “घर घर स्वदेशी” हा संदेश देणाऱ्या महाकाय आकाश फुग्याचे अनावरण या वेळी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
“आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान” अंतर्गत राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि मंडल पातळीवर कार्यशाळा, महिला व युवा संमेलन, व्यापारी व उद्योग परिषद, स्वदेशी मेळावे तसेच “आत्मनिर्भर भारत संकल्प रथ” यांसारखे विविध कार्यक्रम देशभर होणार आहेत. शेतकरी, महिला, युवक, कारागीर, छोटे दुकानदार, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक क्षेत्र तसेच व्यापारी व उद्योग क्षेत्र यामध्ये सक्रिय सहभाग होणार असून “घर घर स्वदेशी” या भावनेतून स्वदेशी उत्पादनांचा प्रसार, लघुउद्योगांना प्रोत्साहन आणि स्थानिक उद्योजकांना आधार देणे हा अभियानाचा मुख्य उद्देश राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती मोहीम, स्पर्धा, परिसंवाद, स्वदेशी मेळावे तसेच सोशल मीडियावर जनसंपर्क अभियान राबवले जाईल. “मी फक्त स्वदेशी स्वीकारतो” हा संकल्प लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, युवक व महिला यांच्याकडून करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. या निमित्ताने #GharGharSwadeshi, #AtmanirbharBharat आणि #VocalForLocal या हॅशटॅग्सद्वारे या चळवळीला डिजिटल बळ दिले जाणार असून या अभियानाच्या माध्यमातून देशाची आर्थिक प्रगती, सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक आत्मनिर्भरता अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
समस्त महाराष्ट्रवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा देताना डोंबिवलीतील “नमो रमो नवरात्रीच्या” निमित्ताने गेली ८ वर्षे स्थानिक कारागीर, उत्पादक, महिला बचतगट आणि व्यावसायिकांना अगोदरपासूनच पाठबळ देत असल्याचे चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. या प्रसंगी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस श्री.शशिकांत कांबळे, मंडल अध्यक्ष श्री. मितेश पेणकर, श्री. करण जाधव, श्री. धनाजी पाटील, सौं. प्रिया जोशी, श्री.शक्तिवान भोईर, श्री.रितेश फडके, श्री. पवन पाटील, श्री.लक्ष्मण पंत, श्री.परेश तेलंगे, श्री.विश्वजीत करंजुले, श्री.नितेश म्हात्रे, श्री.स्वप्निल काटे, श्री.समीर भंडारे, श्री.नवनाथ पाटील, माजी नगरसेवक मुकुंद (विशू) पेडणेकर तसेच सर्व पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.