no images were found
५० पानांचा कोर्ट सीन साकरण्यासाठी अमित भानुशालीने घेतली जीवतोड मेहनत
गेल्या एक महिन्यापासून ज्या खटल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं त्या विलास मर्डर केसचा निकाल अखेर जाहीर झालाय. विलास मर्डर केसमध्ये साक्षी आणि तन्वी दोषी ठरल्या असून त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आलीय. अखेर दोन वर्षांनंतर मधुभाऊंना न्याय मिळाला आहे.
मालिकेतला हा महत्त्वाचा टप्पा साकारण्यासाठी ठरलं तर मगच्या संपूर्ण टीमने कंबर कसली. जवळपास महिन्याभरापासून या खास भागाची तयारी सुरु होती. मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळी या भागासाठी विशेष मेहनत घेत होते. कोर्टाचे सीन साकारण्यासाठी तज्ञांचं मार्गदर्शनही घेतलं गेलं. कोर्टाचं कामकाज नेमकं कसं चालतं याची संपूर्ण माहिती आणि अभ्यास करुनच सीन लिहिले जात होते. मालिकेतले बरेचसे सीन कोर्टाचे असल्यामुळे अभिनेता अमित भानुशाली प्रचंड मेहनत घेत होता. या अनुभवाविषयी सांगताना अमित म्हणाला, ‘मालिकेचं शूटिंग करताना प्रत्येक दिवस ही नवी परीक्षा असते. ठरलं तर मगच्या या महत्त्वाच्या सीनसाठी संपूर्ण टीमने कंबर कसली होती. कोर्टातला शेवटचा सीन ५० पानांचा होता. त्यात सगळ्यात जास्त संवाद माझे होते. या सीनचं स्क्रीप्ट जेव्हा माझ्या हाती पडलं तेव्हा थोडी धाकधुक होती. मात्र मी प्रचंड मेहनत घेतली आणि हा सीन पूर्ण केला. अभिनेता म्हणून हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून केसचा निकाल लागल्यानंतर मालिका संपणार का अशी चर्चा रंगतेय. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मालिकेचा शेवट होत नाहीय. याउलट कथानक अतिशय रंजक वळण घेणार आहे. अजून बरेचसे खुलासे बाकी आहेत. तेव्हा पहात रहा ठरलं तर मग रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’