Oplus_0
no images were found
‘अवकारीका’ १ ऑगस्टला चित्रपटगृहात
स्वच्छता ही सवय आहे, असे म्हटले जाते. ही सवय घराच्या चार भिंतीतच का राहते? आपण आपल्या घराच्या स्वच्छतेइतके आपल्या परिसराच्या स्वच्छतेबद्दल जागरूक राहिलो तर घर, परिसर तर स्वच्छ राहीलच, आपोआप शहर आणि देशही स्वच्छ राहील. हाच विचार घेऊन रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला ‘अवकारीका’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.
कचऱ्याच्या ढिगावरच ज्यांचे आयुष्य तरले आहे, अशाच्यां वेदनेचा शोध घेताना, स्वच्छता दूताला माणसासारखे आयुष्य जगायला मिळावे, त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, त्यांच्या श्रमाचे योग्य मोल व्हावे, या भावनेतून ‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती – दिग्दर्शन केल्याचे अरविंद भोसले सांगतात.
कथा त्यांच्या आत्मसन्मानाची, कथा आपल्या आत्मभानाची,
स्वच्छ, देखण्या, निरोगी भारताची, पृथ्वी लख्ख करणाऱ्या दूतांची…
अशा टॅगलाईनने आलेल्या ‘अवकारीका’ चित्रपटात अभिनेता विराट मडके स्वच्छता दूताच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत या चित्रपटात राहुल फलटणकर, रोहित पवार, विनोद खुरंगळे, पिया कोसुम्बकर, नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, स्नेहा बालपांडे तसेच बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे, आदि कलाकार मंडळी दिसणार आहेत.
स्वच्छतादूत हा कष्टकरी वर्ग अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत कष्ट उपसत असतात. या लोकांच्या संघर्षाकडे आपण कायम दुलर्क्ष करतो. यांच्या जीवनात आर्थिक सुरक्षितता, सामाजिक कलह, आरोग्य समस्या अशा अनेक आव्हानांचा डोंगर उभा ठाकलेला असतो. याच गोष्टींकडे लक्ष वेधून घेत सत्या नावाच्या सफाई कामगाराची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.
‘अवकारिका’ या चित्रपटाला केंद्र सरकारकडून पाठिंबा मिळालेला असून, स्वच्छ भारत मिशन_अर्बन यांच्याकडून त्यांचा अधिकृत लोगो वापरण्याची परवानगी सुद्धा मिळालेली आहे. सामान्य जनता, सरकार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी या सर्वांचा अवकारिका चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा असल्याचे दिग्दर्शक अरविंद भोसले सांगतात.
या चित्रपटाची कथा-पटकथा, संवाद, गीते अरविंद भोसले यांची आहेत. छायांकन करण तांदळे संकलन अथर्व मुळे यांचे आहे. सहदिग्दर्शक रेहमान पठाण तर कार्यकारी निर्माता चेतन परदेशी आहेत. संगीत श्रेयस देशपांडे यांचे असून गायक कैलास खेर, सुनिधी चौहान , ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत. कलादिग्दर्शक शैलेश रणदिवे आहेत.