
no images were found
गांधी मैदानाचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार;
कोल्हापूर (प्रतिनिधी):-गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळा निर्माण करायचा. स्वत:च्या स्टंटबाजी साठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचे नुकसान करायचे आणि नेहमीच या मैदानाचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा, हेच उद्योग सद्या एका समाजकंटक टोळक्याकडून सुरु आहेत. गांधी मैदानाचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार असून, याच टोळक्याकडून गांधी मैदानाच्या विकास कामात खो घालायचे, काम जाणूनबुजून बंद पाडायचे उद्योग सुरु असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केले.
गांधी मैदानाच्या कामाबाबत शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत माहिती देताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असणारे गांधी मैदान ही संपूर्ण कोल्हापूर वासीयांची अस्मिता आहे. शिवाजी पेठेत असलेल्या वरुणतीर्थ तळ्याचे १४ सप्टेंबर १९४३ म्हणजेच सुमारे ७२ वर्षांपूर्वी गांधी मैदानात रुपांतर केले. भौगोलिक दृष्टीने हे पाणी साठण्याचे ठिकाण आहे.
सदर मैदानावर शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरातील खेळाडू सराव करतात. या मैदानात पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी साचण्याचा प्रकार होत होता. परिसरातील मोठी गटर लाईन या मैदानातून जात असल्याने गांधी मैदानात साचणाऱ्या पाण्यास प्रमुख कारणीभूत आहे. यावर उपाययोजना म्हणून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पहिल्या टप्प्यातील रु.४ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे. यातून गांधी मैदानात साचणारे ड्रेनेजचे पाणी नव्याने ड्रेनेज लाईन टाकून इतर मार्गाने वळविण्याचे काम सुरु आहे. यामध्ये गांधी मैदान गेट (न्यू कॉलेज बाजू) पासून दुधाळी नाला असे सुमारे ८४० मीटर ड्रेनेज लाईनचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये दिड बाय दिड मीटर चे मोठे आर.सी.सी चॅनेल बांधकाम होत आहे. सद्यस्थितीत गांधी मैदान गेट ते साकोली कॉर्नर परिसरापर्यंतचे ३८० मीटरचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजेचे अंदाजे रु.२ कोटी ७० लाखांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित अंदाजे ४५० मीटरच्या कामास चार ते पाच महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.
गेल्या काही महिन्यात श्री महाकाली उत्सव, शिवजयंती, श्री हनुमान जयंती यामुळे काम संथगतीने सुरु होते. काही नागरिकांनी या ठिकाणाहून ड्रेनेज लाईन नको म्हणून अर्ज केले होते. परंतु, त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनीही या कामास सहमती दर्शविली.
गेल्या काही महिन्यात या मैदानात असणारी साठणाऱ्या पाण्याचा निचरा करणारी मूळ ड्रेनेज/ गटरची लाईन जाणूनबुजून बंद करण्याचा विकृत प्रकार या परिसरातील काही समाजकंटकाकडून केला जात आहे. यामुळे गांधी मैदानात पुन्हा पाणी साचून मैदानाचे नुकसान करण्याचा डाव आखला जात आहे. गांधी मैदानातील साचलेल्या पाण्याचा निचरा सफाई करताना कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांनाही सदर पाण्याचा मार्ग गाद्या, उशा, सिमेंट पोती टाकून पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा बुजविण्याचा प्रकार मुद्दामहून केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबधित कोल्हापूर महानगरपालिकेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु, अद्यापही सदर प्रकार थांबलेले नसून, गांधी मैदानाचा वापर निव्वळ राजकारण आणि बदनामीच्या हेतूनेच केला जात आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून बदनामीकारक पोस्ट केल्या जात आहेत. निव्वळ स्टंटबाजीसाठी आंदोलने केली जात आहेत. यातून जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधी मैदानाबाबत सातत्याने घडणाऱ्या या घटनेमुळे हजारो खेळांडूचे नुकसान होत असून, शासकीय मालमत्तेचेही नुकसान होत आहे. तसेच शहरात अशांतता व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये शकुनीमामा असणाऱ्या टोळी प्रमुखावर आणि टोळीवर कारवाई करावी अशी मागणीही शिवसेनेच्या वतीने जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसात संथगतीने सुरु असलेल्या कामास गती देण्यात आलेली आहे. हे ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर मैदानात पाणी साठण्याचे प्रमाण नक्कीच बंद होणार आहे. त्यामुळे स्टंटबाज टोळक्यालाही लवकरच स्वप्नपूर्ती झालेली पहायला मिळेल, असा उपहासात्मक टोलाही जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी लगावला.
शकुनी आणि टोळक पेठेला लागलेली कीड : शहरप्रमुख रणजीत जाधव
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कामाचा वाढता आलेख विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठविणारा आहे. “ज्याला पराभूत करता येत नाही त्याला बदनाम केले जाते” याच प्रमाणे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका करण्यात एक टोळक नेहमीच टपलेल असत. हे टोळक म्हणजे संपूर्ण शिवाजी पेठ नाही. त्यामुळे या टोळीने संपूर्ण शिवाजी पेठेला गृहीत धरू नये. त्या टोळीप्रमुख शकुनीमामाच्या वक्तव्याची जनता दखल घेणार नाही. नेहमीच विकासाला विरोध करणारे हे शकुनी आणि टोळक पेठेला लागलेली कीड असल्याचे शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, दीपक चव्हाण, रणजीत मंडलिक, सुनील खोत, कमलाकर किलकिले, अर्जुन आंबी, अमृत परमणे, बंटी साळोखे आदी उपस्थित होते.