
no images were found
एका आईच्या प्रेमाची कसोटी, मारुतीसाठी अंजनीचे बलिदान!
सोनी सबवरील ‘वीर हनुमान’ मालिकेत छोट्या कुतुहलाने भरलेल्या आणि व्रात्य मारूतीचे एका बलशाली, दिव्य योद्ध्यात रूपांतर होण्याची कहाणी उलगडत आहे. पुराणकथा, अॅक्शन आणि भावना यांचा सुंदर गोफ विणत ही मालिका भारताच्या अत्यंत प्राचीन कथेला आकर्षक स्वरूपात प्रस्तुत करते. सर्वांनाच आकर्षित करणाऱ्या या मालिकेत आन तिवारी बाल मारुतीची भूमिका करत आहे, सायली साळुंखे अंजनीची, आरव चौधरी केसरीची तर माहिर पांधी वाली आणि सुग्रीव या दोघांची भूमिका करताना दिसत आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की आपल्या शक्तींवर प्रभुत्व प्राप्त करण्याच्या मारुतीची प्रयत्नांत विघ्न आणण्याचा वालीचा कुटिल कट त्याच्यावरच उलटतो, जेव्हा मारुती करुणा आणि सुजाणता यांचा पक्ष घेऊन हिंसेचा विरोध करतो आणि आपल्या वडिलांना म्हणजे केसरीला कर्तव्यापेक्षा सहानुभूतीला प्राधान्य देण्याची गळ घालतो.
आगामी भागांमध्ये, मारुतीच्या प्रवासाला एक भयानक वळण मिळते कारण वाली कालदंताला मारुतीचे अपहरण करून त्याला पाताळात आणण्याची आज्ञा देतो. कालदंत एक मायावी रूप घेऊन मारुतीला भुलवतो आणि तलातलाच्या अंधाऱ्या राज्यात त्याला अडकवतो. मारुती स्वतःकडे असलेल्या आठ सिद्धींपैकी अणिमा सिद्धीचा उपयोग करून सूक्ष्म रूप धरण करतो आणि कालदंताच्या शरीरात जाऊन त्याला हरवतो. पण, हा विजय त्याला खूप महागात पडतो, कारण तो पुन्हा आपल्या मूळ रूपात येऊ शकत नाही. याचा फायदा घेऊन पातालकलीचे सामर्थ्य लाभलेला कालदंत मारुतीला असा शाप देतो की, त्याच्या आईने, अंजनीने आपल्या जीवनाचे बलिदान दिले, तरच मारुती आपल्या मूळ रूपात येऊ शकेल.
अंजनी आपल्या मुलासाठी हे मोठे बलिदान देईल का की हनुमान आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी सदैव सूक्ष्म रूपात राहणे पसंत करेल?
अंजनीची भूमिका करणारी सायली साळुंखे म्हणते, “मला वाटते, एक अभिनेत्री म्हणून प्रत्येक भूमिका मला पटकथेच्या पलीकडे जाऊन काही तरी शिकवते. ‘वीर हनुमान’ मालिकेत अंजनीची भूमिका करण्याचा अनुभव तर विशेषच आहे. एक माता म्हणून अंजनीचे प्रेम आणि तिचा त्याग आपल्याला हेलावून सोडतो. मी जेव्हा हे दृश्य केले की, जेव्हा अंजनीला हे समजते की तिने स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले तरच हनुमानाला त्याचे मूळ रूप परत मिळेल, तेव्हा ते माझ्या अंतःकरणाला भिडले. मला माझ्या आईची प्रकर्षाने आठवण झाली आणि हे आठवले की माझ्या सगळ्या सुख-दुःखात ती कशी माझ्या पाठीशी निःस्वार्थपणे उभी राहिली आहे. त्या व्यक्तिगत आठवणीमुळे त्या दृश्यातील भावना फारच अस्सल स्वरूपात व्यक्त झाल्या आहेत. अंजनी आणि मारुती यांच्यातील नाते इतके निर्मळ आहे! आणि मला ते पडद्यावर साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता आहे. आम्ही ज्या भावना, जे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे, त्या भावना प्रेक्षकांच्या हृदयाला देखील भिडतील असे वाटते.”