
no images were found
त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज झाले ब्रम्हलीन
नाशिक : अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती महाराज हे ब्रम्हलीन झाले. वयाच्या १०२ व्या वर्षी त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाशिकमध्ये होणाऱ्या अनेक सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
देशभरात सागरानंद महाराज यांचे लाखो भक्त आहेत. ते काही महिन्यांपासून वृद्धपकाळाने आजारी होते. महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज आज पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ब्रम्हलीन झाले. त्यांनी वयाची शंभरी पार केली होती. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा १९६८, १९८०, २००३ आणि २०१५ त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. ते अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष होते. त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासह ईलाहाबाद , प्रयाग, हरिद्वार अशा १९ कुंभमेळ्यात ते सहभागी झाले होते. त्यांची ज्येष्ठ श्रेष्ठ, ज्ञानवृद्ध, तपस्वी जूने जाणते महंत अशी ख्याती आहे. २०२७ च्या कुंभमेळ्याची तयारी सुरु झाली आहे. पण येत्या कुंभमेळ्यात सहभागी होऊ की नाही हे देवाच्या हातात असते, असेही त्यांनी सांगितले होते.
यावर्षी गुरुपौर्णिमा उत्सव आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत झाला होता. अलीकडेच गजलक्ष्मी माता मंदिरात दर्शनाला आले असताना त्यांचे दर्शन भाविकांना झाले. अत्यंत मनमिळावू आणि शांत संयमी साधू म्हणून ते सर्वदूर परिचित होते. दर कुंभमेळ्यात सागरानंद महाराज शासन अधिकारी आणि साधूंमध्ये समन्वय साधायचे. त्यांना आयुर्वेदाविषयी सखोल ज्ञान होते. त्या मदतीने त्यांनी लाखो रुग्णांवर निशुल्क उपचार केले होते.
महंत शंकरानंद सरस्वती उर्फ भगवान बाबा हे ५० वर्षापासून त्यांच्यासोबत आहे. महंत शंकरानंद सरस्वती हे अखिल भारतीय आखाडा परिषदेवर सचिव आहेत. अत्यंत मनमिळावू शांत संयमी साधू म्हणून ते सर्वदूर परिचित होते. प्रत्येक कुंभमेळ्यात त्यांनी शासन अधिकारी आणि साधू यांच्यात समन्वय साधला.
त्यांचे हजारो शिष्य आहेत. तसेच अनेक प्रापंचिक साधकांनी देखील त्यांची गुरुदिक्षा घेतली आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर त्यांच्या गणपताबारी आश्रमात यात्रेचे रुप यायचे यावरून शिष्यांचे त्यांच्यावर असलेले प्रेम दिसून येत होते. आज दुपारी चार वाजता रिंगरोड येथील आनंद आखाडा गजलक्ष्मी मंदिर येथे ते समाधिस्त झाले.