Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम

शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम

9 second read
0
0
43

no images were found

शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम

 

कोल्हापूर(प्रतिनिधी) : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे ‘सेवा ही स्वच्छता सप्ताह’ अभियानांतर्गत आज सकाळी स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्यात आली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ विद्यापीठ परिसरच नव्हे, तर विद्यापीठ परिसराबाहेरील सायबर चौकापर्यंतचा परिसर या मोहिमेअंतर्गत स्वच्छ करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे शिवाजी विद्यापीठातर्फे गेल्या पंधरवड्यापासूनच विभाग व अधिविभागांत अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने सर्वच घटकांना स्वच्छता करावयाचा परिसर नेमून देण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक अधिविभागातील शिक्षक, विद्यार्थ्यांसह प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी त्या त्या परिसराची स्वच्छता केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५००हून अधिक स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विद्यापीठाचे प्रवेशद्वार क्रमांक एकपासून ते सायबर चौकापर्यंतचा कम्पाऊंड भिंतीलगतचा संपूर्ण परिसर कचरा व प्लास्टीकपासून मुक्त केला. फूटपाथ व भिंतीच्या दरम्यान उगवलेली झुडपे काढून तेथीलही स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेमध्ये कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनीही मोहिमेत पूर्णवेळ सहभाग घेऊन स्वच्छता मोहिमेत राबणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या परिसरामधून प्लास्टीकच्या पिशव्या, पोती, ओला व सुका कचरा, प्लास्टीक व काचेच्या बाटल्या यांच्यासह रस्त्याकडेला उगवलेली काटेरी झुडपे व अन्य कचरा मोठ्या प्रमाणावर गोळा करण्यात आला.

तत्पूर्वी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करीत विद्यापीठ परिसरातून डॉ. आप्पासाहेब पवार चौकापर्यंत सहा नंबर प्रवेशद्वारामार्गे प्रभात फेरी काढली. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’, ‘स्वच्छता ही सेवा’ अशा अनेकविध घोषणा यावेळी दिल्या.

विद्यापीठात रुजलाय स्वच्छतेचा संस्कार

विद्यापीठामधील स्वच्छता मोहिमेदरम्यान प्लास्टीक कचऱ्याचे प्रमाण नगण्य आढळून आले. विद्यापीठात सर्वच घटकांत स्वच्छतेचा संस्कार रुजल्याची प्रचिती त्यातून आली. विद्यार्थ्यांसह अभ्यागत हे कचरा संकलनासाठी ठिकठिकाणी ठेवलेल्या कुंड्यांचा वापर करीत असल्याने आणि त्याची योग्य प्रकारे निर्गत केली जात असल्याने हे शक्य झाले. विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांनी यापुढील काळातही आपला विद्यापीठ परिसर असाच स्वच्छ आणि विशेषतः प्लास्टीकमुक्त राहण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…