no images were found
डोंबिवलीत पतीनेच पत्नीसह पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळून केला आगीचा बनाव
डोंबिवली : डोंबिवलीच्या भोपर गावात पहाटेच्या सुमारास आग लागली होती. या आगीत चार जण गंभीर जखमी झाले होते. जखमींपैकी आईसह दोन मुलींची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. जखमी दोन मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास या दोन्ही मुलींनी प्राण सोडले. आधी रविवारी आईचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दोन्ही मुलींनी प्राण सोडले. आता या प्रकरणात धक्कादाय माहिती समोर आली आहे. घराला आग लागली नव्हती तर ती लावण्यात आली होती, असं पोलीस तपासातून समोर आलं आहे. मुलीच्या वडिलांनी आग लावून जिवंत जाळल्याचा आरोप आहे.
प्रीती पाटील ( वय ३५ वर्षे ), समीरा पाटील ( वय १४ वर्षे) आणि समीक्षा पाटील ( वय ११ वर्षे ) या तिघींचा आगीत गंभीर भाजल्याने मृत्यू झाला. या घटनेने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.
आता प्रीती पाटील यांच्या भावाने बहिणीच्या नवऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. आगीच्या घटनेत आरोपी प्रीती पाटील यांचा पती प्रसाद पाटील ( वय ४० वर्षे ) हाही जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पोलिसांनी प्रसाद पाटीलवर कलम ३०२ सह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पाटील हा घटनेत फक्त १० टक्के भाजला आहे.
प्रीती पाटील यांच्या भावाने तिघींच्या मृत्यूला प्रसाद पाटील हाच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. प्रीती, समीरा, समीक्षा यांच्यावर डोंबिवलीतील एमआयडीसीच्या एम्स रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. आगीत गंभरपणे भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.