
no images were found
मराठी भाषेचा उत्कर्ष युवा पिढीच्या हाती -प्रा. डॉ. राजा दीक्षित
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत आज “प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमाले”चे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे प्रास्ताविकात डॉ. अवनीश पाटील म्हणाले की, प्राचार्य शिवाजीराव भोसले हे एक उत्कृष्ट वक्ते, प्रशासक होते. त्यांच्या स्मरणार्थ ही व्याख्यानमाला इतिहास विभागाने आयोजित केली आहे. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी ‘मराठी लढयाचे शतक’ या विषयाची मांडणी करताना मराठी भाषेच्या विकासाचे आणि समृद्धीचे एकूण पाच टप्पे सांगितले. यात पहिला टप्पा संत चळवळ (१३ ते १६ वे शतक), दुसरा टप्पा मराठा काळ (१६३० ते १८१८), तिसरा टप्पा प्रबोधन काळ (१९ वे शतक), चौथा टप्पा (संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र निर्मितीचा काळ), पाचवा टप्पा हा जागतिकीकरणानंतरचा काळ या टप्प्यांच्या आधारे त्यांनी मराठी भाषेच्या विकासाचा आणि त्यात आलेल्या संकटांचा आढावा घेतला.
त्यांनी पुढे सांगितले की, हे मराठी भाषेचे पाच कालखंड आणि मराठी भाषेचे जैविक नाते आहे. मराठी संतांनी मराठी भाषेला खूप मोठी श्रीमंती दिली. मराठा काळ हा मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने भरभराटीचा ठरतो. मराठी भाषा, महाराष्ट्र, मराठ्यांचा इतिहास याचा काळ म्हणजे एकोणीवे शतक. विसाव्या शतकात केसरीचे संपादक तात्यासाहेब केळकर यांनी मातृभाषा हाच स्वराज्याचा पाया आहे. असे सांगून मराठी भाषेला स्वातंत्र्य लढ्याशी जोडले. वि. का. राजवाडे यांनी म्हटले होते की,
मराठीची बेसुमार तोंडदाबणी सुरु आहे. हे थांबविण्यासाठी स्वराज्य हाच उपाय आहे. म्हणजे विसाव्या शतकात मराठी भाषा स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेली अनेक उदाहरणांतून दिसून येते. सध्या आपण मराठीला अधिक समृध्द करण्यासाठी जास्तीत जास्त नवीन शब्दांचा वापर करावा. भाषेचा अभिमान बाळगण्याबरोबरच आपण भाषेसाठी काहीतरी देणे लागतो, याचा विचारही तरुण पिढीने करावा, तेव्हा मराठी भाषेला समृद्धता येईल. अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी मराठीच्या
उत्पत्तीपासून ते आजपर्यंतचा इतिहास दीक्षित सरांनी आपल्यापुढे मांडल्याचे सांगितले. मराठी भाषेच्या उत्कर्षामध्ये संत तुकारामांचे मोठे योगदान आहे. नवतरुणांनी मराठी भाषेचा अभ्यास आणि संशोधन करून तिला जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. दत्तात्रय मचाले यांनी केली. प्रमुख उपस्थितीमध्ये इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अरुण भोसले, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर, किशोर बेडकिहाळ, प्राचार्य विलास पोवार, इस्माईल पठाण, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, इ. उपस्थित होते. आभार डॉ. उमाकांत हत्तीकट यांनी मानले.