no images were found
ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही; फडणवीसांची महत्वाची प्रतिक्रिया
शिंदे सरकारने नवी मुंबईत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. शिंदे सरकारने जरांगे यांच्या आरक्षणाविषयीच्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व राजकीय घडमोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली . ‘सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
कुणबी प्रमाणपत्रावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘काहीही केलं तरी टीका होते. अर्धे लोक इकडे टीका करतात अन् अर्धे लोक तिकडे टीका करतात. शेवटी महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला न्याय द्यायचा आहे. मराठा समाज, ओबीसी समाज आणि धनगर समाजाला न्याय द्यायचा आहे. जो निर्णय घेतला, तो निर्णय ज्यांच्या नोंदी आहेत. त्या मराठा समाजातील नागरिकांना प्रमाणपत्र मिळणार आहे’.
‘मराठा समाजाचा हा अधिकारच होता, तो सोप्या पद्धतीने करण्यात आला आहे. ओबीसी समाजात कोणी वाटेकरी केला आहे असे नाही. 100 टक्के ओबीसी समाजाचं आरक्षण सुरक्षित केले आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये असा मार्ग काढला आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षणाविषयी काढलेल्या अध्यादेशाविषयी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्या भूमिकेवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते. मी त्यांच्याशी बोलेल. आम्ही नेमकं काय केलं आहे, ते त्यांच्या लक्षात आणून देणार आहे. या निर्णयातून सुवर्णमध्य काढला आहे. भुजबळ यांनी काहीही काळजी करण्याचे कारण नाही. हे सरकार काहीही झालं, तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.