no images were found
विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर व्हायरल !
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अभ्यास, परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते. पण कित्येकदा अभ्यास न झाल्याने परीक्षेत कॉपी केली जाते किंवा मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर काहीही लिहिलं जातं. आता एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर पाहून अनेकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. सध्या याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.
सध्या सोशल मीडियावर एक उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका विद्यार्थ्याने अतिशय विचित्र उत्तर लिहिले आहे. राज्यशास्त्राच्या परीक्षेत भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणती सीमा आहे? तिची लांबी सांगा? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना एका विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील एका शाळेत राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणती सीमा आहे? तिची लांबी सांगा? याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बारावीच्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमा हैदर आहे आणि लांबी ५ फूट ६ इंच असून यावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू असल्याचे उत्तरपत्रिकेत नमूद केले आहे. आता, ही उत्तरपत्रिका जवळजवळ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. हे प्रकरण धौलपूर जिल्ह्यातील बसेरी येथील बगथर सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील असल्याचा दावा केला जात आहे.
या मजेशीर उत्तराबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या कमेंट केल्या जात आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की “विद्यार्थ्याने या प्रश्नाची चेष्टा केली आहे,” तर काही लोकांचे म्हणणे आहे की, “विद्यार्थ्याला प्रश्न समजलेला दिसत नाही.” व्हायरल होत असलेल्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने राज्यशास्त्राच्या परीक्षेत विचारलेल्या पहिल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले, त्यासाठी शिक्षकाने त्याला दोन गुणही दिले आहे. कारगिल युद्ध केव्हा आणि कोणत्या देशांमध्ये लढले गेले, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर- कारगिल युद्ध १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाले असल्याचे उत्तर विद्यार्थ्याने लिहिले.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या उत्तरपत्रिकेबाबत शाळेत जाऊन चौकशी केली असता सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या उत्तरपत्रिकेचा शाळेशी काहीही संबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे वृत्त आहे. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कुमार यांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेली उत्तरपत्रिकेचा आमच्या शाळेशी काहीही संबंध नाही. शाळा व्यवस्थापन आणि संबंधित शिक्षकांनी दिशाभूल करून उत्तरपत्रिका प्रसिद्ध केल्या जात असल्याचा दावा केला आहे.