
no images were found
राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली
कोल्हापूर : पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित तीन दरवाजे उघडले असून कसबा बावडा येथील राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली गेला आहे. राधानगरी धरणातून ९४१८ क्युसेक विसर्ग होत असून २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
काळ अनेक भागात मुसळधार पाउस झाला. शाहूवाडी, राधानगरी, आजरा परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित ३, ५ व ६ क्रमांकाचे एकूण तीन दरवाजे टप्प्या-टप्प्याने उघडले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. पुराचे पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस अशाच स्वरुपाचा पाऊस असेल. कालपासून सुरू असलेल्या पावसाचा पिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या भात व भुईमुगाला पावसाची आवश्यकता आहे. आणखी काही दिवस पाऊस जर असाच होत राहिला तर मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढेल.
तेरवाड-शिरोळ बंधारे पाण्याखाली
कुरुंदवाड : सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा -पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. द्य्म्यान मध्यरात्रीच्या सुमारास तेरवाड व शिरोळ हे दोन्ही बंधारे तिसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर येऊ लागले आहे. तेरवाड बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी 44 फूट, 3 इंच झाली आहे. शिरोळ बंधाऱ्याजवळ 33 फूट झाली आहे. तर कृष्णा नदीची राजापूर बंधाऱ्याजवळ 21 फूट,4 इंच पाणी पातळी झाली आहे. राजापूर बंधाऱ्यातून 44 हजार 333 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कर्नाटक राज्यात सुरू आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत रात्रीतून 4 फुटाने वाढ झाली आहे. पंचगंगा नदी पात्रा बाहेर आली आहे. तेरवाड स्मशानभूमी जवळ पाणी आले आहे. गवताच्या कुरणातही पाणी शिरले आहे. कुरुंदवाड पालिकेने अनवडी नदी व गोठणपूर परिसरात पाहणी करून बॅरिकेट्स लावले आहेत.