
no images were found
शिवाजी विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार
कोल्हापूर – भारतातील कृषी संशोधन प्रणाली जागतिक दर्जाची बनलेली असल्यामुळे आज आपला देश अन्नधान्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे. समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्यातील चार आणि देशामधील सत्तर कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन कार्य मोठयाप्रमाणात सुरू आहे, असे मत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांनी व्यक्त केले. आज, शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के उपस्थित होते. कुलगुरू डॉ.शिर्के आपले मत व्यक्त करताना म्हणाले, हा सामंजस्य करार समाजास आणि शेतकरी वर्गाला उपयुक्त ठरेल. जगाच्या पाठीवरील प्रत्येक वनस्पती उपयोगी असते. त्याचे संवर्धन करून मानवाच्या विकासामध्ये त्या वनस्पतींचा कसा उपयोग होईल यावर संशोधकांनी महत्वपूर्ण काम करणे आवश्यक आहे. कृषी पिके आणि औषधी वनस्पतींमुळे भारताचे महत्व जागतिक पातळीवर गणले जाणार आहे.
या सामंजस्य करार अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने आजरा घनसाळ,काळा जिरगा, काळ भात आणि ब्लॅक राईस या स्थानिक देशी वाणांच्या उन्नतीचे (mutation) जे कार्य केले आहे त्याचे परीक्षण राज्य आणि देश पातळीवर करण्यासाठी या करारातून पुढील कार्य होणार आहे.तसेच या करारा अंतर्गत भविष्यात विद्यापीठातून तयार होणारे विविध पिकांचे आणि औषधी वनस्पतींचे सुधारित वाण व त्याचे राज्य व देश पातळीवरील ट्रायल्स ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या
संयुक्त विद्यमाने केले जाईल. त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या पदवी पूर्ण करण्यासाठी फिल्ड प्रोजेक्ट/ जॉब ऑन ट्रेनिंग/ किंवा रिसर्च प्रोजेक्ट अनिवार्य करण्यात आले आहेत. या फिल्ड प्रोजेक्ट /जॉब ऑन ट्रेनिंग आणि रिसर्च प्रोजेक्टच्या कार्यासाठी दोन्ही विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठाचे दालन खुले होणार आहे. अशा सामंजस्य करारामधून कृषी आणि अकृषी विद्यापीठातील दरी कमी होईल आणि दोन्ही विद्यापीठाच्या माध्यमातून
विद्यार्थी आणि समाज यांना विद्यापीठातील उपलब्ध असलेल्या सुविधांचा फायदा करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी आवाहन केले.
याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठ तर्फे कुलसचिव डॉ. व्ही. एस. शिर्के, कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील प्राचार्य डॉ सातापा खरबडे, वित्त अधिकारी श्री सदाशिव पाटील, शेंडा पार्क येथील कृषी संशोधन केंद्राचे डायरेक्टर डॉ ए ए पिसाळ, इगतपुरी येथील कृषी संशोधन केंद्राचे डायरेक्टर डॉ हेमंत पाटील, डॉ सुनील कराड, डॉ शैलेश कुंभार उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ पी. एस. पाटील , अधिष्ठता विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा डॉ. एस. एच. ठकार,कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही डी जाधव, डॉ. एन. बी. गायकवाड, डॉ. एस. जी. घाणे, डॉ. के. बी. पवार ,डॉ. एस. ए. पाटील, डॉ. एम. एस. निंबाळकर, डॉ. एस. एम. पाटील, डॉ. जे. पी. जाधव, डॉ.के. डी. सोनवणे, डॉ. ए. ए. देशमुख, डॉ. एस. आर. एनकंची,डॉ. पी. डी. पाटील इत्यादी उपस्थित होते.