Home सामाजिक जातीव्यवस्था नष्ट करण्यात आलेले अपयश चिंताजनक: डॉ. यशवंतराव थोरात

जातीव्यवस्था नष्ट करण्यात आलेले अपयश चिंताजनक: डॉ. यशवंतराव थोरात

14 second read
0
0
32

no images were found

जातीव्यवस्था नष्ट करण्यात आलेले अपयश चिंताजनक: डॉ. यशवंतराव थोरात

      कोल्हापूर, ( प्रतिनीधी ): महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याने शूद्रातिशूद्रांना शिकवून जातीव्यवस्थेवर प्रखर आघात केला; मात्र आज दोनशे वर्षे उलटल्यानंतरही जातीव्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आपण यशस्वी झालेलो नाही, हे चिंताजनक आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत व अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज येथे व्यक्त केली.
      ‘सावित्रीबाई फुले: हर लाईफ, हर रिलेशनशीप, हर लिगसी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झाले. रिटा राममूर्ती गुप्ता यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी लिहिलेल्या या पहिल्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.
        डॉ. थोरात म्हणाले, जोतिराव फुले व सावित्रीबाई यांनी पावणेदोनशे वर्षांपूर्वी शूद्रातिशूद्र व स्त्रिया यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली करून जातीच्या उतरंडीला आव्हान दिले. पण अजूनही आपली जातमानसिकता बदललेली नाही. कनिष्ठ जातींना जे दुःख भोगावे लागले, त्याची पुसटशीही कल्पना जातव्यवस्थेच्या उतरंडीत स्वतःला उच्च स्थानी मानणाऱ्या जातींना येणार नाही. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्वच्छतेची गरज आहे. त्यासाठी पुन्हा आपल्याला फुले-शाहू-आंबेडकर यांचाच मार्ग अनुसरावा लागेल. समता, सामाजिक न्याय यांच्या आधारावरच समाजसुधारणेचा मार्ग व्यापक व विकसित होत जातो. त्या दिशेने प्रवासाला सुरू करण्याची गरज आहे.विद्यापीठांनी आता सावित्रीबाई- फातिमा शेख यांच्याविषयी संशोधनात्मक अभ्यास होण्याची आवश्यकताही डॉ. थोरात यांनी व्यक्त केली.
      डॉ. यशवंतराव थोरात यांनी काही प्रश्न विचारून लेखिका रिटा राममूर्ती गुप्ता यांना बोलते केले. सावित्रीबाईंविषयीच पुस्तक लिहावे, असे का वाटले? या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गुप्ता म्हणाल्या, जेव्हा एका स्त्रीबाबत लिहीण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सावित्रीबाईंशिवाय माझ्यापुढे कोणतेही नाव नव्हते. कोणताही सामाजिक बदल कोणा एका व्यक्तीच्या प्रयत्नातून होत नाही. त्यास सामूहिक प्रयत्नांची गरज असते. सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, सगुणाबाई क्षीरसागर या तिघी म्हणजे माझ्या दृष्टीने भारताची संकल्पना होय. सावित्रीबाईंनी तर लहान असतानाच नायगावमध्ये अगदी एकलव्याप्रमाणे शिकण्याचा प्रयत्न चालविलेला होता. म्हणजे तेव्हापासूनच शिकण्याची ऊर्मी त्यांच्यात होती. जोतिराव फुले यांच्यासारखा सखा लाभल्याने त्या ऊर्मी प्रत्यक्षात साकार झाल्या आणि पुढचा इतिहास घडला.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सावित्रीबाईंविषयीच्या पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठात होते आहे, याचा मनस्वी आनंद होतो आहे. सावित्रीबाईंनी त्यांच्या पहिल्या फळीच्या विद्यार्थिनींवर जो शिक्षणाचा संस्कार केला, प्रभाव टाकला, त्या अनुषंगाने संशोधन होणे हे आवश्यकच आहे. मात्र, आजच्या पिढीतल्या सावित्रीच्या लेकींनाही आपल्या या संचिताचा अभिमान वाटला पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी अभ्यास व संशोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
        सुरवातीला अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले. सावित्रीबाई, फातिमा शेख आणि सगुणाबाई या तिघींनी धर्म परंपरांना आव्हान देत शिक्षण प्रसाराचे केलेले कार्य अतुलनीय स्वरुपाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला बाळ पाटणकर, इंद्रजीत घोरपडे, डॉ. उषा थोरात, डॉ. भगवान हिर्डेकर, डॉ. अरूण शिंदे, डॉ. केशव हरेल यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक

पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश केला; मुख्य आरोपीला अटक      …