
no images were found
मंत्रिमंडळ विस्तारावर अखेर शिक्कामोर्तब ?
मुंबई/पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर मध्यरात्री बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होताच भावी मंत्र्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
आपल्यालाच मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा दावा शिंदे-भाजप-पवार समर्थक आमदारांकडून केला जात आहे. काही आमदारांनी तर कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. येत्या १८ ते १९ ऑक्टोबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप हा महायुती सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक मंत्रिपदं भाजपच्या वाट्याला येणार आहे. याशिवाय शिंदे गट आणि अजित पवार गटाला समान मंत्रिपदाच वाटप केले जाणार आहे. महामंडळातील खातेवाटपात सुद्धा हाच फॉर्म्यूला वापरला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय पहिल्या दोन्ही पक्षातील प्रत्येकी ९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
मंत्रिमंडळ्याच्या पहिल्या विस्तारात मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने शिंदे गटात नाराजीचं वातावरण पसरलं होतं. आता दुसऱ्या विस्तारात तरी आपल्याला संधी मिळेल, अशी आशा अनेकांना होती. मात्र, अजित पवार यांची सरकारमध्ये एन्ट्री होताच ही आशा मावळली. दुसऱ्या विस्तारात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्याच नजरा लागून होत्या. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तर भाजपकडून सुद्धा अनेक आमदार मंत्रिपदाच्या आशेवर आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.