
no images were found
मोदी सरकारएवढा शेतकऱ्यांचा अपमान कोणी केला नाही! शरद पवार
कोल्हापूर :शेती पिकांपासून साखर उद्योगांपर्यंतच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतमालास किंमत नाही आणि बँकांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे. कांद्यावर 40 टक्के निर्यातकर लावला आहे. दिल्लीच्या सीमेवर 12 महिने शेतकरी आंदोलन करत होते. मात्र या 12 महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱयांनी ढुंकूनही पाहिले नाही. मोदी सरकारएवढा शेतकऱयांचा अपमान यापूर्वी कोणीही केला नाही. अशा लोकांना पुन्हा सत्तेत बसवायचे का नाही हा निर्णय आता जनतेलाच घ्यावा लागेल, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार प्रथमच आज कोल्हापूर दौऱयावर आले होते. ऐतिहासिक दसरा चौकात शरद पवार यांची निर्धार सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते.शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कारभारावर सडेतोड टीका केली. आज जनता बेकारी, महागाईने त्रस्त आहे. आमच्या घामाची किंमत द्या एवढी एकच मागणी शेतकरी आणि तरुण करत आहे. आज शेतीची अवस्था बिकट आहे. बारा महिने कुटुंबातील सर्व सदस्यांना घेऊन शेतात राबणाऱया शेतकऱयांच्या जीवनात संकट आहे. यवतमाळ जिल्हय़ात 18 दिवसांत 24 शेतकऱयांनी आत्महत्या केली. डोक्यावर कर्ज आहे ते फेडायची ताकद नाही. ही गंभीर परिस्थिती असताना मोदी सरकारचे शेतकऱयांकडे लक्ष नाही, असे पवार म्हणाले.