
no images were found
केंद्राच्या कांदा निर्णयामुळे पाकिस्तानला फायदा?
शनिवारी केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्काबाबत निर्णय घेतला आणि यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र यामुळे शेतकरी, व्यापारी, निर्यातदार हे सर्वच संतप्त झाले. केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि घातक असल्याचं मत ते व्यक्त करत असून या निर्णयाचा फायदा पाकिस्तानला होईल, असं निर्यातदार बोलत आहेत.
केंद्र सरकारने शनिवारी एक अधिसूचना जारी केली असून कांद्यावर ४०टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहेत. 31 डिसेंबर 2023 पर्यंत हे निर्णय लागू राहणार असून वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा हा एक प्रयत्न आहे. कांद्याची मागणी वाढली असून भविष्यात जर कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी झाली, तर त्यासाठी आपल्याकडे पुरेसा साठा शिल्लक रहावा, यादृष्टीने देखील हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हा निर्णय घेताना फक्त ग्राहकच नाही, तर शेतकऱ्यांचा देखील विचार करण्यात आला असून या निर्णयामुळे भारतात कांद्याच्या भावावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
एकीकडे भारती पवार या जरी असं म्हणत असल्या तरी दुसरीकडे मात्र केंद्राच्या या निर्णयाविरोधात कांदा उत्पादक आणि शेतकरी संघटना मात्र आक्रमक झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता, महागाईचा विचार करता कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसून चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असताना निर्यात शुल्क वाढवण्यात आला. निर्यात शुल्क वाढवल्याने व्यापारी कांद्याला योग्य भाव देणार नाही आणि यात बळीराजाचंच मरण होणार असून कुठलाही निर्णय घेताना स्थानिक पातळीवर त्याचे काय परिणाम होतील, याचा केंद्र सरकारने विचार करायला हवा, असं शेतकरी संघटना म्हणत आहेत. हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा देखील शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे
आता हे झालं शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं… पण आता केंद्राच्या या निर्णयाचा देशांतर्गत व्यवहारांवर, निर्यातीवर कसा परिणाम होईल ते ही बघा… हा निर्णय म्हणजे विश्वसनीय अशी ओळख असलेल्या भारताच्या इमेजलाच धक्का असल्याचं निर्यातदार बोलत आहेत. रातोरात आणि सुट्टीच्या दिवशी घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फटका निर्यातदार, व्यापारी, शेतकरी, मजूर अशा सर्वांनाच बसणार आहे. शनिवारच्या निर्णयानंतर भारत निर्यात बंदी पण करू शकतो, या विचाराने बांगलादेश आणि श्रीलंकेने तात्काळ कांद्याचे दर वाढवून टाकले आहेत.