
no images were found
कोल्हापूर ते नंदवाळ आषाढी वारीचे 29 जून रोजी आयोजन
कोल्हापूर : प्रति पंढरपूर नंदवाळ या कोल्हापूरहून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठल मंदिरात आषाढी वारीत कोल्हापूर जिल्ह्यासह निपाणी–बेळगांव– खानापूर–सांगली परिसरातील 200 हून अधिक गावातील पन्नास हजार वारकरी बंधू-भगिनी सहभागी होतील. गुरुवार 29 जुन रोजी सकाळी साडेसात वाजता विठ्ठल मंदीर, मिरजकर तिकटी येथुन ही दिंडी सुरु होईल. पुईखडी येथे वाखरी प्रमाणे रिंगण सोहळा संपन्न होणार आहे. तर पुर्वसंध्येला बुधवार 3 वाजता 28 जून रोजी नाथा गोळे तालीम मंडळ चौक येथून विठ्ठल मंदिर मार्गे नगर प्रदक्षिणा संपन्न होणार आहे. या दोन दिवसाचा लाभ समस्त विठ्ठल भक्तांनी सहभागी होवून घ्यावा असे आवाहन संयोजक श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाचेवतीने ह.भ.प. दिंडी प्रमुख लाड महाराज, दिपक गौड व संयोजक अध्यक्ष बाळासो पोवार यांनी केले आहे.
आषाढी यात्रेच्या सुरवातीस बुधवार 28 जून रोजी पहाटे विठ्ठल मंदिरात पूजा व अभिषेक श्री. सचिन चव्हाण व सौ. जयश्री चव्हाण यांचे हस्ते होणार आहे. तसेच भव्य नगर प्रदक्षिणा दुपारी तीन वाजता नाथागोळे तालीम चौक जय शिवराय तरूण मंडळ येथून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होईल. यामध्ये महाराष्ट्र ढोल पथक, वारकरी व टाळकरी यांच्यासह पारंपारीक वांद्याचा समावेश असेल. या माऊलींच्या पालखीचे प्रस्थान मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार, कु. पुष्कराज राजेश क्षीरसागर, जुना राजवाडा पीआय. श्री. सतिशकुमार गुरव यांच्या हस्ते संपन्न होईल.
दुपारी चार वाजता विठ्ठल मंदिर, मिरजकर तिकटी येथे आरती होऊन नगरप्रदक्षिणेस प्रारंभ होईल यामध्ये सौ. वैशाली राजेश क्षीरसागर सौ. सिध्दी गणेश रांगणेकर, सौ. रंजना राजेंद्र जाधव, सौ. संगिता अजित चव्हाण, यांचा समावेश असेल. विठ्ठल मंदिर, मिरजकर तिकटी– महाव्दार रोड–भवानी मंडपातील उभ्या रिंगण सोहळ्यासह ही दिंडी मिरजकर तिकटीहून टिंबर मार्केट येथील सासने इस्टेट येथे विसाव्यास जाईल. येथे सर्व वारकरी बंधूना श्रीमती शिलावती बाळासाहेब सासने व परिवाराच्यावतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे. यावेळी सहभागी वारकरी बंधु -भगिनींची आरोग्य तपासणी पंत वालावलकर हॉस्पिटल यांच्या वतीने केली जाणार आहे. या मुक्कामाच्या ठिकाणी ह.भ.प. एम. पी. पाटील यांचे प्रवचन आणि दिंडी प्रमुख आनंदराव लाड महाराज यांचे किर्तन होणार आहे. करवीर तालुक्यातील कांडगांवच्या आठ बैलजोड्या सलग 19 वर्षीही सहभागी होत आहेत. तसेच मोरेवाडीतील संतोष रांगोळे यांचे दोन अश्वही रिंगण सोहळ्यात दिंडीत सहभागी असणार आहेत. कळंबा येथील भगवान शामराव तिवले हे चोपदार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.