
no images were found
गांधी मैदानाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अभ्यासपूर्वक कामाचे नियोजन करावे : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : गांधी मैदान ही शहराची अस्मिता आहे. गेल्या काही वर्षात गांधी मैदानात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे मैदानाचे नुकसान होवून, खेळाडूंची गैरसोय होत आहेच परंतु, पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरून नागरिकांच्या मालमत्तांचे देखील नुकसान होत आहे. त्यामुळे गांधी मैदानापासून निघणाऱ्या नाल्यातील सांडपाणी अडथळा न होता दुधाळी एस.टी.पी प्लांट पर्यंत पोहचणे गरजेचे आहेत. त्याकरिता पावसाळी पाणी आणि सांडपाणी निचरा करणाऱ्या स्वतंत्र ड्रेनेज लाईन निर्माण करण्याबाबत अभ्यासपूर्वक आराखडा तयार करावा. मंजूर निधीतून प्रस्तावित कामाचाही अभ्यास करून कामाचे नियोजन करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
नगरविकास विभागाकडून मंजूर झालेल्या रु.५ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांची पाहणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.यावेळी प्रस्तावित कामांची माहिती देताना संदीप गुरव यांनी, पावसाळ्यात मैदानात साचणारे पाणी सद्यस्थितीत असलेल्या नाल्याची पुनर्बांधणी करून निचरा करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. यासह न्यू हायस्कूल कडून येणारे सांडपाणी थेट गांधी मैदानाच्या नाल्यात न मिसळता नव्याने महाराष्ट्र हायस्कूल ते सरदार चौक ते अपना बँक ते उभा मारुती ते साकोली कॉर्नर पर्यंत व गांधी मैदान लगतची स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजचे काम करण्यात येणार आहे. यामुळे गांधी मैदानात येणारे सांडपाण्याचा नव्याने तयार करण्यात येणाऱ्या ड्रेनेजद्वारे निचरा होणार असल्याची माहिती दिली.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, पाणी साचण्याचे मूळ कारण शोधून त्यावर तात्पुरती मलमपट्टी होईल असे काम होवू नये. साचणारे सांडपाणी विनाअडथळा दुधाळी एस.टी.पी प्लांट पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यामुळे याचा प्रथम अभ्यास करावा. सांडपाणी निचरा होण्याची क्षमता तपासून हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठीच स्वतंत्र ड्रेनेज लाईन निर्माण करण्याचा आराखडा आखावा. याकरिता पुन्हा बैठक घेवून आराखड्याचे सादरीकरण करावे. अतिरिक्त निधी लागल्यास त्याकामी पाठपुरावा करू पण मंजूर निधीतून गांधी मैदानात साचणारे पाणी कायमस्वरूपी बंद होण्यासाठी अभ्यासपूर्वक काम करावे, अशा सूचना दिल्या.यावेळी श्री.राजेश क्षीरसागर,महानगरपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या सोबत महात्मा गांधी पुतळा, अपना बँक परिसर, काशीद बोळ आदी भागाची पाहणी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कामत, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहरअभियंता नेत्रदिप सरनोबत, अभियंता संदीप गुरव, शिवसेना महानगरसमन्वयक शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, मंदार पाटील, सुरज साळोखे, शैलेश साळोखे, रुपेश इंगवले, कपिल सरनाईक, राज अर्जुनिकर, निलेश गायकवाड आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.