
no images were found
अधिवेशनात विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी
कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारने शेतकरी प्रश्नावर सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे.निर्णय झाले नाही तर येत्या अधिवेशनामध्ये विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते मा. खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.
वीज तोडणी, ऊस तोडणी मुकादमकडून होणारी फसवणूक थांबवावी, एकरकमी एफआरपी , शेतक-यांना दिवसा वीज द्या , किमान हमीभावाचा कायदा लागू करा , शेतक-यांना दिवसा वीज द्या , पिकविमा तातडीने खात्यावर जमा करा, नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना ५० हजार रुपये दिले पाहिजे. या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावर असलेल्या चेकनाक्यावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेट्टी पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. यात शेतकर्यांचे प्रश्न बाजूला राहिले आहे. जे सत्तेत आहेत ते मजेत आहेत. जे विरोधात आहेत ते शेतकर्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकर्यांनी जगायचे कसे असा प्रश्न पडलाय. अडचणीत असलेल्या शेतकर्याला तुटपुंची मदत जाहिर केली आणि तीही वेळेवर मिळत नाही. पीक विमा कंपन्या मालामाल झाल्या. हजारो कोटींचा नफा मिळवला आणि ज्या शेतकर्यांनी विम्याचे पैसे भरले आहेत त्यांना मात्र उन्हातान्हात उभी राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकर्यांसाठी आहे की कार्पोरेट कंपन्यांना डल्ला मारण्यासाठी प्रधानमंत्री कार्पोरेट कल्याण योजना आहे का? असा सवाल उपस्थित केला.
एकनाथ शिंदे सरकार सत्तेवर आले आणि महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य अशी घोषणा केली. परंतु शेतकर्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. सध्या उन्हाळा सुरुवात झाला आहे. विहिरीत व बोरमध्ये पाणी आहे मात्र विजेची कनेक्शन तोडणी जात असल्याने पीके वाळत आहेत. धरणात तयार होणार्या विजेवर शेतकर्यांचे हक्क आहे मग शेतकर्यांना दिवसा वीज का दिली जात नाही. शेतकरी १५ टक्के वीज वापरत असून ३० टक्के वीज वापरत असल्याचे खोटे रेकॉर्ड दाखवले जात असून शेतकर्यांना फसविले जात असल्याची आरोप शेट्टी यांनी केला.
यावेळी सावकार मादनाईक, शैलेश आडके, विठ्ठल मोरे, सचिन शिंदे, सागर मादनाईक, सागर शंभूशेट्टे, यांच्यासह पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त करून सरकारचा निषेध केला. या चक्का जाम आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावर सुमारे १० किलोमिटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.