
no images were found
शेतकऱ्यांकडून वसूली विरुद्ध राजू शेट्टी करणार दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारीला आंदोलन
नाशिक : नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून वसूली मोहीम सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना सोडून जिल्हा बँकेने सर्वसाधारण शेतकऱ्यांकडून वसूली मोहीम सुरू केली आहे. अनेक कर्जदार शेतकऱ्यांचे वाहने बँकेने जप्त करण्यात सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे देखील सहभागी होणार आहे. यामध्ये राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने पुकारलेल्या बिऱ्हाड मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे. राजू शेट्टी यांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. जिल्हा बँकेने सुरू केलेली वसूली थांबवावी, कर्ज माफ करू नका पण काहीतरी सवलत द्या यासाठी हातातील काम सोडून या आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन केले आहे.
राजू शेट्टी यांनी यावेळी शेतकऱ्यांना एक चिमटाही काढला आहे, दे रे हरी खाटल्यावरी असे चालणार नाही, आंदोलनात बघ्याची भूमिका घेऊ नका असे थेट सुनावत आंदोलन अधिक आक्रमकपणे करण्यासाठी आवाहन केले आहे. दरम्यान १६ जानेवारीला होणाऱ्या आंदोलनात राजू शेट्टी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत असून या आंदोलनात राजू शेट्टी काय भूमिका घेतात याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.