
no images were found
महाराष्ट्र सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी ८ ऑगस्टला
नवी दिल्ली : लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन राज्यातल्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 8 ऑगस्ट म्हणजेच येत्या सोमवार होणार आहे. घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती न्यायालयाने दिली. सर्वोच्च न्यायालयात काल सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातल्या तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर सुनावणी झाली. सर्वांचे म्हणणं ऐकल्यानंतर यावरील सुनावणी आज घेण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत आज सुनावणी झाली. याप्रकरणी आठ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल, तोपर्यंत शिवसेनेच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेवू नका, अशी सूचना या वेळी न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली. तसेच हे प्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्याबाबतही आम्ही निर्णय घेवू, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील हरिश साळवी यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, आमदारांनी पक्षाच्या विरोधात मत दिल्याचा निष्कर्षावरुन विधानसभा अध्यक्ष त्यांचे सदस्यत्व बरखास्त करु शकतात का, पक्षांतर बंदी कायदा हा पक्षातील मतभेदांवर आहे का, ठोस कारण समजल्याशिवाय आमदारांवर अपात्रतेची कारवाई होवू शकत नाही.
राज्यात स्थानिक निवडणूका येत आहेत त्यामुळे चिन्ह कोणाकडे यासाठी निवडणूक आयोगाकडे अपील केली आहे, मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे. अशावेळी पक्षाचे दोन गट असता कामा नये, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी केला. तर हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्याची गरज नाही, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे कपिल सिब्बल यांनी केला.