no images were found
आविष्कार २०२६चे विभागीय यजमानपद एनआयटीकडे: कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना संशोधन, नवकल्पना मांडण्याची संधी
कोल्हापूर(प्रतिनिधी):- विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला, नवकल्पनांना आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणाऱ्या ‘आविष्कार २०२६’ या विभागीय स्पर्धेचे यजमानपद उचगांव (ता. करवीर) येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर संचलित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी)कडे सोपविण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी यास मान्यता दिली आहे.
नाशिक येथे गेल्या आठवड्यात विद्यापीठातर्फे ‘आविष्कार २०२६’ मार्गदर्शनपर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एनआयटीने स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रस्ताव सादर करून आवश्यक तयारी दर्शविली. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाने आपली क्षमता स्पष्ट केली.
कार्यशाळेत डॉ. संजय खोब्रागडे, डॉ. संगीता मेटकर, प्रा. अनिकेत जंगम आणि प्रा. तेजस महागावकर यांनी मार्गदर्शन केले. एनआयटीतर्फे प्रा. प्रवीण जाधव व डॉ. विवेक माने उपस्थित होते. ‘आविष्कार’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन संकल्पना, नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधन प्रकल्प आणि समस्या सोडविण्याच्या अभिनव पद्धती तज्ज्ञांसमोर मांडण्याचे व्यासपीठ मिळणार आहे,’ असे डॉ. संगीता मेटकर यांनी सांगितले.
या विभागीय स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला संशोधनाची दिशा देण्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन व नवोपक्रमाची संस्कृती रुजविण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे डॉ. संजय खोब्रागडे यांनी नमूद केले.
एनआयटीचे डायरेक्टर डॉ. संजय दाभोळे यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन व समस्या सोडविण्याच्या क्षमतेला या स्पर्धेमुळे चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांनी महाविद्यालयाकडे आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, नियोजन क्षमता आणि आयोजनाचा अनुभव उपलब्ध असल्याचे सांगितले.
स्पर्धेसाठी प्रा. दीपक जगताप पुरुष समन्वयक, तर सौ. अर्चना गायकवाड महिला समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.