no images were found
अतिरेक असणाऱ्या अतिक्रमणाना पाठीशी घालणार नाही, पण..फेरीवाल्यांना सणासुदीच्या काळात व्यवसायाची मुभा द्या;- आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अनधिकृत हातगाड्या व अतिक्रमणांविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत बाजार गेट, पान लाईन परिसरासह विविध भागांत कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे हातावरचे पोट असलेल्या फेरीवाल्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाने आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन आपल्याला व्यवसाय करण्यासाठी मार्ग काढून देण्याची विनंती केली.
फेरीवाल्यांनी आमदार क्षीरसागर यांच्यासमोर आपल्या अडचणी मांडताना, सणासुदीचा काळ सुरू असल्याने या दिवसांत व्यवसायातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. महापालिकेच्या कारवाईमुळे व्यवसाय बंद झाल्यास आर्थिक अडचणी निर्माण होतील, त्यामुळे नियमांचे पालन करून व्यवसाय करण्यासाठी योग्य जागा व आवश्यक मुभा मिळावी, अशी मागणी केली.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी फेरीवाल्यांच्या अडचणी समजून घेत, “अतिक्रमणाचा अतिरेक करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. मात्र, हातावरचे पोट असलेल्या फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गांभीर्याने घेतला पाहिजे,” अशी भूमिका स्पष्ट केली.
सणावारांच्या दिवसांत नागरिकांची मोठी गर्दी बाजारपेठांमध्ये होत असते. या काळात अनेक फेरीवाले व हातगाडीधारक छोट्या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे सर्व फेरीवाल्यांकडे अतिक्रमणाच्या एकाच निकषातून न पाहता, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे, नागरिकांना त्रासदायक ठरणारे तसेच अतिरेक करणारे अतिक्रमण आणि मर्यादित स्वरूपात व्यवसाय करणारे फेरीवाले यामध्ये फरक करणे आवश्यक असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
“सणासुदीच्या दिवसांमध्ये हातावरचे पोट असलेल्या फेरीवाल्यांना व्यवसायासाठी मुभा द्यावी. त्याचवेळी शहरातील वाहतूक, नागरिकांची सुरक्षितता आणि स्वच्छता यांचाही विचार करून योग्य नियोजन करावे,” अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.
या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन, अतिक्रमण निर्मूलन पथक आणि फेरीवाल्यांचे प्रतिनिधी यांच्यात समन्वयाने चर्चा होणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या सोमवारी दि.०७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०० कोल्हापूर महानगरपालिकेत संबंधित अधिकाऱ्यांची व फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करावी, अशा स्पष्ट सूचना आमदार क्षीरसागर यांनी महापालिका आयुक्तांना फोनवरून दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण माजी महापौर नंदकुमार वळंजू, माजी महापौर आर.के.पोवार, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, इस्माईल बागवान, अनिल पाटील, रियाज बागवान आदी शिवसेना पदाधिकारी व फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.