no images were found
पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवाचा संदेश देत महावॉकेथॉन रॅली संपन्न :प्रशासनाच्या प्रमुखांसह नागरिक, विद्यार्थ्यांचे महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर
कोल्हापूर : मृदा संधारण व जलसंधारण हे शेती पर्यावरण व शाश्वत विकासाचा पाया आहे. माती आणि पाणी हे नैसर्गिक संसाधने एकमेकांवर अवलंबून असून भविष्यातील पिढीसाठी त्यांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत जनजागृती वाढवण्यासाठी आणि आजच्या युवा पिढीला याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. 21 ऑगस्ट जलसंधारण दिन शाश्वत विकासासाठी मृदा संधारण व जलसंधारणाची राज्यव्यापी जनजागृती करून जलसंधारणाला चळवळीचे स्वरूप देण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर चे आयोजन करण्यात आले. कोल्हापूर मध्ये वारणा भवन येथून निघालेली महावाकेथॉन रॅली पाणी आडवा पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा. पाणी वाचवूया भविष्य घडवूया असा संदेश देत जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी, विद्यार्थी, नागरीक यांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागासह उत्साहात संपन्न झाली.
या रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, मृदा व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील पवार, उपकार्यकारी अभियंता संतोष पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, पाणी वाचवा, देश घडवा, समृद्ध महाराष्ट्र घडवा हा संदेश देण्यासाठी महावॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले. पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब अडवला गेला पाहिजे… आणि अडवलेला प्रत्येक पाण्याचा थेंब जिरवला गेला पाहिजे… आपली धरणे गाळमुक्त झाली पाहिजेत आणि आपली शिवारे गाळयुक्त झाली पाहिजेत. यासाठी या जलसंधारणाच्या अभियानामध्ये सर्व स्तरातील घटकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे, याची जाणीव ठेवून याच्या संवर्धनासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.
वॉकेथॉनमध्ये समीर दगडू पाटील हे प्रथम स्थानावर आले. तर तुकाराम कृष्णात मोरे द्वितीय, करण रमेश गवळी तृतीय, शिवराय नामदेव कात्रे चतुर्थ, मयूर कृष्णात अडसूळ पाचवे, प्रतीक सुभाष कांबळे सहावे, संजय शामराव जाधव सातवे, दिलीप मोहनराव कुमठेकर आठवे, अनिल बनाबाई पांडुरंग कांबळे नववे, मनीषा मोहन गराडे दहावे स्थानावर आले. विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी प्रियांका सुनील जाधव, संयुक्त आनंद गायकवाड, डॉ. आशा रेघे यांनाही महिलांमध्ये विशेष प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले.
यामध्ये डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विवेकानंद महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, महावीर महाविद्यालय, इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, द न्यू कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, जलसंधारण विभागाचे सर्व जलसंधारण अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.