no images were found
संततधार पावसामुळे शिवाजी विद्यापीठातील जलाशयांच्या पातळीत लक्षणीय वाढ
कोल्हापूर, : कोल्हापूर शहर व परिसरात गेले काही दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शिवाजी विद्यापीठ परिसरातील जलस्रोत वेगाने भरू लागले असून, परिसरातील तलाव, विहिरी आणि शेततळ्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसराला पुन्हा एकदा हिरवाईची आणि जलसमृद्धीची नवी झळाळी प्राप्त झाली आहे.
विद्यापीठातील भाषा भवन परिसरातील ‘शिव जलाशय’ आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाजवळील तलाव यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. परिसरात पावसाचे पाणी साठविण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या चरींमधून वाहत येणारे पाणी भाषा भवन तलावात धबधब्याप्रमाणे कोसळत असल्याने तेथील दृश्य विशेष आकर्षण ठरत आहे.
सध्या ढगाळ वातावरण, हिरवाईने नटलेला परिसर, जलाशयांतील वाढता पाणीसाठा आणि तलावात धबधब्यांप्रमाणे कोसळणारे पाणी यामुळे विद्यापीठ परिसराने रमणीय रूप धारण केले आहे. निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि विद्यापीठातील कर्मचारी या नयनरम्य दृश्याचा आनंद घेत आहेत.
पावसामुळे जलाशयांतील पाणीसाठा दिवसागणिक वाढत असून, परिसरातील वृक्षसंपदा आणि जैवविविधतेलाही त्याचा मोठा लाभ होत आहे. जलसंवर्धनाच्या दृष्टीने विद्यापीठाने उभारलेल्या विविध संरचनांमुळे पावसाच्या प्रत्येक थेंबाचे प्रभावी संधारण होत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. विद्यापीठ परिसरातील नैसर्गिक जलस्रोत भरू लागल्याने भूजलपातळी वाढण्यास मदत होणार असून, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास हे जलाशय लवकरच पूर्ण क्षमतेने भरतील, अशी अपेक्षा आहे.