no images were found
कोल्हापुरात येणाऱ्या संशयित बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर तात्काळ कारवाई करावी; शिवसेनेचे जिल्हा अधीक्षकांना निवेदन
कोल्हापूर : कोल्हापूर हे आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि सामाजिक सलोख्याचे शहर आहे. या शहराची कायदा सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका निर्माण होऊ नये, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगालमधील पराभवानंतर संपूर्ण देशात मुस्लिम रोहिंग्यांची एक लाट आलेली आहे, कोल्हापुरातील वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून कोल्हापुरात देखील बांगलादेशी नागरिकांचा बेकायदेशीर वास्तव्य निदर्शनात येत आहे. तसेच गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेस या रेल्वेमार्गाद्वारे संशयित बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक दररोज कोल्हापूर शहर व जिल्ह्यात येत आहेत. या व्यक्तींची ओळख, वास्तव्यासंबंधी कागदपत्रे तसेच त्यांच्या वास्तव्याचा उद्देश याबाबत शंका निर्माण होत असून यामुळे स्थानिक कायदा व सुव्यवस्था तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या संशयित बेकायदेशीर नागरिकांची शोधमोहीम राबवून त्यांच्यावर आणि त्यांना आसरा देणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.नीलोप्तल यांच्याकडे केली.
आज सकाळी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.ना.राजेश क्षीरसागर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण याच्या नेतृत्वाखाली शिवसेनच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.नीलोप्तल यांची भेट घेवून निवेदन सादर केले.
या निवेदनात पुढे म्हंटले आहे कि, संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेसमधून येणाऱ्या संशयित व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात यावी, त्यांचे ओळखपत्र व नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी तसेच जे नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याचे आढळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच रेल्वे स्थानक परिसर, शहरातील विविध वस्त्या व संशयित वास्तव्याच्या ठिकाणी विशेष तपास मोहीम राबवून अशा व्यक्तींची, त्यांना अनधिकृतपणे आसरा देणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित करावी व आवश्यक ती कठोर कारवाई करावी.
यावेळी पोलीस उपअधिक्षक तानाजी सावंत, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, नगरसेविका मंगल साळोखे, किशोर घाटगे, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष दीपक चव्हाण, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अनिल पाटील, गजानन भुर्के, सुरेश माने, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, पूजा भोर, पूजा कामते आदी उपस्थित होते.