no images were found
आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत सर्वसमावेशक व समतोल विचार व्हावा: डॉ.हुलगेश चलवादी
उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन
पुणे:- महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सध्या सामाजिक व राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे सर्वेसर्वा तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाची समतोल भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या आणि अत्यंत वंचित घटकांपर्यंत पोहोचावा. मात्र उपवर्गीकरणामुळे दलित समाजात फूट पडेल; ही भीती दूर करण्याची गरज आहे. यासोबतच बौद्ध समाजावर अन्याय होणार नाही; याची काळजी सरकारने घ्यावी, अशी भूमिका पक्षाची असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी म्हणाले.
राज्यात अनुसूचित जातीमध्ये एकूण ५९ जातींचा समावेश आहे. आजवरच्या प्रवासात काही जातींना आरक्षणाचा चांगला फायदा झाला आहे, तर ज्या जातींमध्ये शिक्षणाचे प्रमाण अजूनही कमी आहे, त्या आरक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून काहीशा दूर राहिल्या आहेत. याच वस्तुस्थितीमुळे मातंग समाजाकडून उपवर्गीकरणाची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, ही मागणी पूर्ण करताना आंबेडकरी अनुयायांची आणि प्रामुख्याने बौद्ध समाजाची भावनाही समजून घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.बौद्ध समाजाने गेल्या काही दशकांत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. शिक्षण आणि जागृतीमुळेच हा समाज पुढे जाऊ शकला. त्यामुळे उपवर्गीकरणाचा कोणताही निर्णय घेताना या प्रगत घटकांवर कोणताही अन्याय होता कामा नये, ही आमची आग्रहाची भूमिका आहे. आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी इतर समाज बांधवांनीही शिक्षणामध्ये गतीने प्रगती करणे आवश्यक आहे, कारण शिक्षण हाच प्रगतीचा खरा पाया आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.
आपण सर्व अनुसूचित जाती म्हणून आधी एकत्र आले पाहिजे. एकजूट हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्यात कितीही मतप्रवाह किंवा विचार असले, तरी आपण सर्वांनी एकत्र बसून, सखोल चर्चा करून आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेऊनच यावर एकमताने सुवर्णमध्य आणि योग्य तो तोडगा काढला पाहिजे.