no images were found
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक ‘कॉल’ युद्ध थांबवण्यासाठी पुरेसा! : यूएईच्या माजी राजदूतांच्या विधानाचे हेमंत पाटील यांच्याकडून समर्थन
पुणे,: इराण आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष पाहता, संपूर्ण जगाचे लक्ष आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लागले आहे. संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत, ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींच्या जागतिक मुत्सद्देगिरीचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांचा केवळ एक फोन कॉल या दोन देशांमधील रक्तरंजित संघर्ष थांबवण्यास सक्षम आहे, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
‘जगाला युद्ध नको, तर बुद्ध हवा’ असा संदेश देणारा भारत एक महान राष्ट्र म्हणून जागतिक पटलावर उभा आहे. पंतप्रधान मोदींचे इस्रायलशी असलेले दृढ संबंध आणि इराणशी असलेले मैत्रीपूर्ण व्यवहार, विशेषतः इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार म्हणून भारताची भूमिका, यामुळे भारत या वादात प्रभावी मध्यस्थ ठरू शकतो. युएईचे माजी उच्चायुक्त मिर्झा यांनी देखील भारताच्या या ‘प्रोफाईल’वर शिक्कामोर्तब केले आहे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे पाटील म्हणाले.
मध्यपूर्वेतील या युद्धामुळे जागतिक शांतता धोक्यात आली असून त्याचे चटके भारतालाही बसत आहेत. युएईमध्ये राहणाऱ्या ३५ लाख भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करीत जगात शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदींमध्ये जागतिक नेत्यांना एकत्र आणण्याची आणि कठीण प्रसंगात तोडगा काढण्याची क्षमता आहे. त्यांनी या युद्धामुळे पीडित निष्पाप जनतेला दिलासा देण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती पाटील यांनी केली आहे. भारताच्या या भूमिकेमुळे जगाला युद्धाच्या छायेतून बाहेर काढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.