no images were found
महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस हरपला!आमदार अमल महाडिक
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे. राजकारणातील एक उमदा आणि स्पष्टवक्ता नेता काळाने हिरावून नेला. मिश्किल आणि ओघवती भाषणशैली, प्रशासनावरील मजबूत पकड आणि दिलखुलासपणे वावर यामुळे अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय होते. सामान्य कार्यकर्त्यांसमवेत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यातल्या प्रत्येक शहरात आणि गावात अजितदादा पवार या व्यक्तिमत्त्वावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मनात पोरकेपणाची भावना आज दाटून आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक धाडसी निर्णय दादांनी घेतले. नजीकच्या काळात कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरण प्रक्रिया गतीने व्हावी यासाठी अजितदादा आग्रही होते. त्याचबरोबर कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसह अन्य विषयांमध्ये त्यांनी जातीने लक्ष घातले होते. अनेकदा जाहीर सभा आणि बैठकांमधून माझ्या कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही असे उद्गार दादांनी काढले होते. महाडिक कुटुंबीयांसोबत दादांनी राजकारणापलीकडचे ऋणानुबंध जपले होते. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी शिरोली इथल्या निवासस्थानी भेट देऊन जिल्ह्याचे नेते माजी आमदार आदरणीय महादेवरावजी महाडिक यांची भेट घेऊन दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. यावेळी त्यांनी पाठीवर मारलेली कौतुकाची थाप आजही माझ्या स्मरणात आहे. दादांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचे सावट आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, सहकार अशा विविध क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवणाऱ्या अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!