no images were found
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत गरिमा कौशलची एंट्री
सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विता (सुंबुल तौकीर खान)चा प्रवास उलगडून दाखवला आहे. आत्ता अन्विता संजय (ऋषी सक्सेना)च्या मनातील वाढती असुरक्षितता आणि विराट (रजत वर्मा)चा अजून मनावर असलेला प्रभाव यामध्ये सापडली आहे. त्यात विराटचे वडील राजनाथ वर्मा (फारूख सईद) यांच्या दमदार उपस्थितीमुळे मामला आणखीन गुंतागुंतीचा झाला आहे. अन्विताला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत, ज्यात तिची ताकद आणि नाती यांची कसोटी होणार आहे.
कथानक पुढे सरकते, नाट्य आणखी तीव्र होते आणि पर्सी कॅफेचे भवितव्य अधांतरी लटकते. अन्विता जेव्हा हा कॅफे लॉन्च करण्याच्या आपल्या स्वप्नपूर्तीच्या अगदी जवळ असते तेव्हा तिच्यासमोर एक अनपेक्षित आव्हान उभे राहते. विराट परत येतो, पण हा विराट तिच्या परिचयाचा नाही. तो बदलला आहे, कडवट झाला आहे आणि तुटकही झाला आहे. आपल्या वडिलांसारख्या निर्दयी व्यक्तीत आपले रूपांतर करण्याचा ठपका तो अन्वितावर ठेवतो. त्या कॅफेचा खरा मालक स्वतः असल्याचा दावा करत विराट अन्विताला ती जागा सोडण्याचा आदेश देतो. ती इमारत जमीनदोस्त करून त्या जागी एक आधुनिक इमारत बांधण्याचा आपला मानस तो सांगतो. आपल्या आठवणी, ऊब आणि समुदायाशी निगडीत असलेली ती जागा आपल्या हातून निसटून देण्यास अन्विता तयार नाही. त्यामुळे पर्सी कॅफे वाचवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करते. जेव्हा आशा विझत असल्यासारखे वाटते, तेव्हाच ध्रुवी (गरिमा कौशल)ची एंट्री होते. ध्रुवी वारसा जपणाऱ्या आणि समुदायाच्या जागांचे जतन करण्यात मानणारी आहे. ती पुढे येऊन अन्विताला साथ देते. एकाच उद्दिष्टाने ध्रुवी आणि अन्विता हातमिळवणी करतात आणि पर्सी कॅफेच्या रूपातील मूर्त वारसा जपण्यासाठी लढा देण्यास सज्ज होतात.
ध्रुवीच्या मदतीने अन्विता पर्सी कॅफे वाचवू शकेल का की विराटची नतद्रष्ट योजना सफळ होईल?
ध्रुवीची भूमिका करणारी गरिमा कौशल म्हणते, “मी जेव्हा ध्रुवीची व्यक्तिरेखा आणि तिची विचारसरणी समजून घेतली तेव्हा ती तत्काळ मला आपलीशी वाटली. ध्रुवीविषयी मला ही गोष्ट फार आवडते की ती स्वतःच्या स्वार्थापलीकडे पाहते. ती केवळ अन्विताला साथ देण्यासाठी मालिकेत आलेली नाही, तर एक विचारसरणी सादर करणारे हे पात्र आहे. व्यक्तिशः मला अशा गोष्टींचे आणि जागांचे जतन करणे महत्त्वाचे वाटते, ज्या लोकांना एकत्र आणतात म्हणजे निसर्ग, कला किंवा भावना आणि आठवणींशी संबद्ध जागा. त्यामुळे ध्रुवीच्या भूमिकेत शिरणे मला सहज वाटले. अन्विताला साथ देण्याचा तिचा निर्णय सहानुभूती आणि हिंमतीमधून आला आहे आणि मला वाटते प्रेक्षक त्याचे स्वागत करतील.”
अन्विताची भूमिका करणारी सुंबुल तौकीर खान म्हणते, “कथानकातील हा टप्पा मला खूप प्रिय आहे, कारण त्यामध्ये ‘कितीही प्रतिकूल बळ तुमच्याविरुद्ध असले तरी, जे खरे आहे, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्या’बद्दल सांगितले आहे. मला वाटते आपल्यापैकी अनेकांच्या जीवनात असे काही तरी असते, जे खूप वैयक्तिक वाटते. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली, तरी त्याच्यासाठी आपण झगडतो. पर्सी कॅफे वाचवण्यासाठी अन्विता जो लढा देत आहे, त्यामागे भावना, चिकाटी आणि विश्वास आहे. आणि मला वाटते, बऱ्याच प्रेक्षकांना हा लढा आपलासा वाटेल.”