
no images were found
अहो आश्चर्य, खून झालेला पती सहा वर्षांनी जिवंत सापडला
रांची : एखाद्या रहस्यमय चित्रपटासारखी विचित्र घटना उघडकीस आणली आहे. झारखंडमधील पलामूमध्ये पोलिसांनी सहा वर्षांपूर्वी हत्या झालेली व्यक्ती जिवंत सापडली आहे. याप्रकरणी या व्यक्तीच्या पत्नीशिवाय सासू, सासरे या तिघांनाही अटक करण्यात आली होती. आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीलाच अटक केली आहे. कौटुंबिक वैमनस्यातून आरोपीने पत्नी आणि सासू-सासऱ्यांना फसवण्याचा कट रचला होता. सातबरवा पोलिसांनी पलामूच्या छतरपूर पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे.
पलामू जिल्ह्यातील छतरपूरच्या नवा बाजार गावातील हे प्रकरण आहे. नवा बाजार येथील रहिवासी असलेल्या राममिलन चौधरी उर्फ चुनियाचं लग्न २००९ मध्ये सातबरवा पोलीस स्टेशन हद्दीतील पोची गावात राहणाऱ्या सरिता कुमारीसोबत झाला होता. २०१६ मध्ये त्यांची पत्नी सरिता देवी यांनी राममिलन चौधरीविरुद्ध हुंड्यासाठी मारहाण आणि छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांनी राममिलन संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाला आणि त्याचा भाऊ दिलीप चौधरी याने त्याच्या खुनाचा गुन्हा दाखल केला.राममिलन चौधरीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी सरिता देवी, सासू कलावती देवी, सासरे राधा चौधरी, भाऊ आणि काका याशिवाय गावातील कुदरत अन्सारी, लालन मियाँ आणि दानिश अन्सारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आठही आरोपींना पोलिसांनी अटक करून कारागृहात रवानगी केली होती. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले. मात्र, नंतर ६ जण कोर्टातून जामिनावर बाहेर आले. या प्रकरणी दानिश अन्सारी अजूनही तुरुंगात आहे. मुलीचे वडील राधा चौधरी हा धक्का सहन करु शकले नाहीत आणि जामिनानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, हुंड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राममिलन चौधरी उर्फ चुनिया याने सासरच्या मंडळींना फसवण्याचा कट रचला होता. या कटात त्याच्या भावाचाही समावेश होता आणि तो स्वतः बेपत्ता झाला होता. मात्र, आता राममिलन चौधरी जिवंत असल्याची माहिती सासरच्या मंडळींना मिळाली. त्यांनी तत्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर छतरपूर पोलिसांच्या मदतीने सातबरवा पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी सापळा रचला आणि त्याला पकडले. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.