no images were found
विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये रुजविण्याबाबत राज्यभर शाळांमध्ये विविध उपक्रम
कोल्हापूर, : विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये रुजविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनसोबत मिळून-मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यभरात राबविण्यासाठी सामंजस्य करार केला असून पुढील 5 वर्षांमध्ये राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे.
26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त राज्यातील शाळांनी पुढील कार्यक्रम / उपक्रम मूल्यवर्धनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून राबवावेत, ज्यात संवैधानिक मूल्य रुजविण्याचा दृष्टिकोन अंगीकारणे महत्त्वाचे आहे. हे विविध उपक्रम पुढीलप्रमाणे – संविधान दिन प्रभात फेरी, संविधान व्याख्यानमाला / सेमिनार, संविधानविषयक चित्रकला व पोस्टर स्पर्धा, संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा (Quiz Competition), संविधान विषयक पथनाट्य, संविधानावर आधारित पोवाडा / गाणी सादरीकरण, मानवी साखळी निर्मिती, सेल्फी पॉईंट I love Constitution व संविधानावर आधारित हस्तकला स्पर्धा आदी उपक्रम राबवायचे आहेत.
Bशाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत वरीलप्रमाणे संपूर्ण राज्यभर शाळास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन (SMF) मार्फत हे उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली आहे.