no images were found
सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती
कोल्हापूर (प्रतिनिधी): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती डोंगर, कर्नाटक येथील श्री रेणुका देवीच्या यात्रेकरिता दरवर्षी कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जातात. सदरच्या यात्रेकरिता गेली ३५ वर्षे श्री रेणुका देवीचे भक्त प्रासंगिक कराराद्वारे एस.टी. गाडीचा वापर करतात. याबाबत गेल्या १२ वर्षात केलेल्या पाठपुराव्यामुळे दरवर्षी वर्षी एस.टी. महामंडळाने सौंदती यात्रेसाठी ४५ आसन क्षमते पर्यंतच्या परिवर्तन बसेससाठी खासबाब म्हणून प्रत्यक्ष चालविण्यात आलेल्या कि.मी. प्रमाणे भाडे दर आकारणी व खोळंबा आकार रुपये १०/- प्रती तास बस आकारण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे भाविकांचे लाखो रुपये वाचले आहेत. परंतु एस.टी. महामंडळ तोट्यात असल्याने यावर्षी पुन्हा एस.टी. बसेसच्या भाडे व खोळंबा आकारामध्ये वाढ करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला होता. याबाबत कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना व करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनांच्या शिष्टमंडळाने दर व खोळंबा आकार कमी करण्याची मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे केली होती. त्यानुसार सौंदत्ती यात्रेसाठी विशेष सवलत द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी परिवहन मंत्री ना.श्री.प्रताप सरनाईक यांचेकडे केली होती. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधून परिवहन मंत्री ना.श्री.प्रताप सरनाईक यांना सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सूचना देण्याची विनंती केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने आज सौंदत्ती यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या विशेष बसेससाठी कि.मी. आकार व खोळंबा आकाराचे परिपत्रक पारित केले असून, यामध्ये विशेषबाब म्हणून किमान कि.मी.प्रमाणे आकारणी न करता प्रत्यक्ष चालविण्यात आलेल्या कि.मी.साठी प्रति कि.मी. रुपये ६४/- दराप्रमाणे आकारणी करण्यास व खोळंबा आकार रुपये १०/- प्रति तास प्रति बस आकारण्यास मान्यता दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे की, यावर्षी सौंदती येथील मार्गशीष पौर्णिमा यात्रा माहे डिसेंबर २०२५ रोजी दरम्यान पार पडणार आहे. यासह माहे फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या चैत्र्य यात्रेकरिताही कोल्हापूर जिल्हाच्या ग्रामीण भागासह शहरातील कसबा बावडा आदी परिसरातून लाखो नागरिक सौंदती डोंगर येथे जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षात ज्या सुविधा राज्य परिवहन विभागाकडून भाविकांना देण्यात आल्या त्याच सुविधा पुन्हा देणे गरजेचे आहे यावर्षी प्रती कि.मी. भाडे दरात वाढ केली होती, हा दर विशेष सवलती अंतर्गत कमी करावा व खोळंबा आकार पूर्वीप्रमाणे नाममात्र करावा, अशी मागणी केली. त्यानुसार विशेष सवलती नुसार लागू करण्यात आलेले दर व खोळंबा आकार भाविकांना दिलासा देणारी आहे. सदर सवलत आगामी डिसेंबर २०२५ व फेब्रुवारी २०२६ या महिन्यातील पौर्णिमेच्या यात्रेकरिता सौंदती यात्रा, कर्नाटक करिता विशेष यात्रा सवलत म्हणून असणार असल्याची माहितीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
शिवसेनेच्या वतीने सौंदत्ती डोंगर येथे भाविकांसाठी सुविधा
सौंदत्ती डोंगर येथे असणाऱ्या अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांची अत्यंत गैरसोय होत असल्याचे दिसून येते. त्यासाठी गेले १२ वर्षे सौंदत्ती येथे जाणाऱ्या भाविकांसाठी शिवसेना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन यांच्या वतीने सलग तीन दिवस मोफत आरोग्य शिबीर आणि अल्पोपहाराचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही सलग तीन दिवस वैद्यकीय सेवा आणि अल्पोपहार सेवा भाविकांसाठी उपलब्ध असणार असून, याचाही लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.