no images were found
सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी : आमदार राजेश क्षीरसागर यांची परिवहन मंत्र्यांकडे लेखी मागणी
कोल्हापूर( प्रतिनिधी ): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती डोंगर, कर्नाटक येथील श्री रेणुका देवीच्या यात्रेकरिता दरवर्षी कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जातात. सदरच्या यात्रेकरिता गेली ३५ वर्षे श्री रेणुका देवीचे भक्त प्रासंगिक कराराद्वारे एस.टी. गाडीचा वापर करतात. याबाबत गेल्या १२ वर्षात केलेल्या पाठपुराव्यामुळे दरवर्षी वर्षी एस.टी. महामंडळाने सौंदती यात्रेसाठी ४५ आसन क्षमते पर्यंतच्या परिवर्तन बसेससाठी खासबाब म्हणून प्रत्यक्ष चालविण्यात आलेल्या कि.मी.साठी प्रती कि.मी.रुपये ५५/- प्रमाणे भाडे दर आकारणी व खोळंबा आकार रुपये १०/- प्रती तास बस आकारण्यास मंजुरी दिली होती. परंतु यावर्षी पुन्हा एस.टी. बसेसच्या भाडे व खोळंबा आकारामध्ये वाढ केली असून, सौंदत्ती यात्रेसाठी विशेष सवलत द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी परिवहन मंत्री ना.श्री.प्रताप सरनाईक यांचेकडे केली आहे. यावर तपासून कार्यवाही करण्याचे आदेश परिवहन मंत्री ना.श्री.प्रताप सरनाईक यांनी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना दिले आहेत.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, यावर्षी सौंदती येथील मार्गशीष पौर्णिमा यात्रा माहे डिसेंबर २०२५ रोजी दरम्यान पार पडणार आहे. यासह माहे फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या चैत्र्य यात्रेकरिताही कोल्हापूर जिल्हाच्या ग्रामीण भागासह शहरातील कसबा बावडा आदी परिसरातून लाखो नागरिक सौंदती डोंगर येथे जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षात ज्या सुविधा राज्य परिवहन विभागाकडून भाविकांना देण्यात आल्या त्याच सुविधा पुन्हा देणे गरजेचे आहे. यावर्षी प्रती कि.मी. भाडे दरात वाढ केली असून हा दर विशेष सवलती अंतर्गत पूर्वीप्रमाणेच करावा असे निवेदन जिल्हातील श्री रेणुका भक्त संघटनांनी दिले आहे. करण्यात आलेली दरवाढ भाविकांवर आर्थिक बोजा टाकणारी असून, यातून भाविकांना दिला देण्यासाठी आगामी डिसेंबर २०२५ व फेब्रुवारी २०२६ या महिन्यातील पौर्णिमेच्या यात्रेकरिता सौंदती यात्रा, कर्नाटक करिता विशेष यात्रा सवलत म्हणून एस.टी.खोळंबा आकार रद्द होवून एस.टी. भाडे दर पूर्वीप्रमाणे कमी व्हावा. यासह प्रत्यक्ष प्रवासाच्या होणाऱ्या किलोमीटर प्रमाणे भाडे आकारणी करणेबाबतच्या सूचना संबधितांना मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.
दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांनी परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या विभाग नियंत्रकांना भाडे दर आणि खोळंबा आकारासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच यातून तोडगा काढून भाविकांना दिलासा दिला जाईल, अशी माहितीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.