no images were found
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यांसाठी योग्य ती कार्यवाही करा ! – हिंदु जनजागृती समितीच
कोल्हापूर (प्रतिनिधी ):- राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचर्यात किंवा गटारात पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते, तसेच ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाबाह्य ठरते. तरी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्वीकारले. हे निवेदन जिल्हा परिषद येथे माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांना, तर प्राथमिक शिक्षण विभागात अधीक्षक उदय सरनाईक यांना देण्यात आले.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. दिलीप भिवटे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. विजयकुमार पाटील, भाजपचे श्री. सचिन कुकलर्णी, हिंदु महासभेचे श्री. विकास जाधव, सौ. वंदना बंबलवाड, हिंदुत्वनिष्ठ रामभाऊ मेथे, सुमित बंबलवाड, अमोल गुरव, सचिन भोसले, कमलाकर किलकिले, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. कैलास दीक्षित आणि श्री. अमर जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. प्रीतम पवार उपस्थित होते.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
१ शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी.
२.जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी.
३. सर्वच शाळांतून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवण्यासाठी शासनाने निर्देश द्यावेत.