no images were found
लग्नात आंदण म्हणून पुस्तकाच्या कपाटाची प्रथा सुरु होईल, त्याचवेळी समाज प्रगतीपथावर जाईल – ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार
कोल्हापूर (प्रतिनिधी):लग्नात आलिशान मोटारी, फ्रिज, वॉशिंग मशीन यासारख्या महागड्या वस्तू आंदण म्हणून देण्याची प्रथा समाजाला अधोगतीकडे नेत आहे. ज्या दिवशी वधू पित्याकडून वराला पुस्तकाचे कपाट भेट देण्याची प्रथा सुरु होईल, त्या दिवशी समाजाची प्रगतीकडे वाटचाल सुरु होईल, असा विश्वास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी बोलताना व्यक्त केला.
गेली तेरा वर्षे राजर्षी शाहू महाराजांच्या विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार यासाठी कार्यरत असलेल्या शाहू छत्रपती फौंडेशनच्या राजर्षी शाहू आदर्श शिक्षक आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कारांचं वितरण शाहू स्मारक भवनात झालं. यावेळी अध्यक्ष स्थानावरून डॉ पवार बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ बी एम हिर्डेकर, रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त उद्योगपती एम बी शेख, रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे प्रमुख अशोकराव शिंदे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. जॉर्ज क्रूझ, सचिव जावेद मुल्ला, चंद्रकांत कांडेकरी, डॉ. सुरेश पाटील, नवाब शेख, डी डी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ जयसिंगराव पवार पुढे म्हणाले ‘ राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी विवेकानंद, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य वाचनाच्या माध्यमातून समाजमनाची मशागत होण्याची आवश्यकता आहे. यासाठी वधूपित्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात आंदण म्हणून महागड्या भेटी न देता मनाची मशागत करणाऱ्या थोर पुरुषांच्या जीवन चरित्र आणि विचारांच्या पुस्तकाचे कपाट भेट देण्याची प्रथा सुरु करायला हवी. तरच या समाजमनाची खऱ्या अर्थाने मशागत होईल.
यावेळी बोलताना डॉ बी एम हिर्डेकर यांनी आजच्या घडीला देशाला विचारवंतांची नव्हे, तर आचार वंतांची गरज असल्याच्या मुद्द्यावर भर दिला. आजच्या शिक्षण व्यवस्थेवर देखील त्यांनी कटू शब्दात कोरडे ओढले. मुलांपर्यंत पोहोचणारा शिक्षकवर्ग निर्माण होण्याची आवश्यकता व्यक्त करताना पदवीचं महत्व कमी होत असल्याच्या मुद्द्यावर डॉ हिर्डेकर यांनी उपस्थित्यांचं लक्ष वेधलं.
या सोहळ्यात राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीनं कार्यरत असलेले शिक्षक, शिक्षण क्षेत्रात उपक्रम शील असलेले मान्यवर आणि पत्रकारिते मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शाहू छत्रपती आदर्श शिक्षक आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये – राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार – श्रीराम साळुंखे, संदीप आडनाईक , धनश्री जाधव, श्री बिरदेव एज्युकेशन सोसायटी तर राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार – हणमंत बागल, श्रीकांत चव्हाण, प्रियांका गवळी, मल्लाप्पा खराडे, नंदकुमार यादव, बाजीराव जाधव, आनंदराव भोसले, वैशाली भोराडे, संयोगिता महाजन, अमित कांबळे, पांडुरंग पाटील, जस्मिन कलाल, पद्मश्री लोळगे, भाग्येश कांबळे यांना गौरवण्यात आले.
या सोहळ्यात पुढील वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेच्या राज्यभरातील शाळा मधील सात हजार विद्यार्थी राजर्षी शाहू आचार विचार प्रसार परीक्षेत सहभागी होतील, अशी घोषणा संस्थेचे विश्वस्त उद्योगपती एम बी शेख यांनी केली. स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे सचिव जावेद मुल्ला यांनी केले. आभार डी डी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले