
no images were found
अखेर अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार
मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. यानंतर भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं. अखेर भाजपनं निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्य घेतला. भाजपच्या माघारीमुळे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजप उमेदवार मुरजी पटेल माघार घेणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुरजी पटेल भाजपकडून लढणार नाहीत. ते अपक्षददेखील लढणार नाहीत, असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं. पटेल यांच्या माघारीमुळे लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल लटकेंनी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले. भाजपनं पटेल यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सांगितल्यानं त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहे. राज ठाकरेंच्या पत्रावरून भाजपचे नेते निर्णय का घेतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि राज यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वेत निवडणूक होत आहे.
ठाकरे गटानं या ठिकाणी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी दिली. शिंदे गटही पोटनिवडणूक लढवणार होता. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली. त्यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला. ठाकरे गटानंही हीच मागणी केली. त्यामुळे निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला. मात्र यानंतर शिंदे गटानं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.