
no images were found
कलाकारांनी पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या रामनवमीच्या उत्सवाच्या आठवणी शेअर केल्या
राम नवमी म्हणजे श्रीरामाच्या जन्माचा उत्सव, भक्ती आणि उत्साहाने भारलेला एक पारंपरिक उत्सव, पूजा-अर्चा करून अंतर्मुख होण्याचा आणि पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या मूल्यांना अधिक दृढता देण्याचा उत्सव. या मंगल दिनी करुणा पांडे, सायली साळुंखे, सुमित राघवन आणि भारती आचरेकर हे सोनी सब वरील लोकप्रिय कलाकार आपल्या कुटुंबातील रामनवमी उत्सवाच्या सुंदर आठवणी शेअर करत आहेत.
या कलाकारांसाठी रामनवमी हा केवळ एक सण नाही, तर ते भक्तीचे, प्रेमाचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. भव्य पूजा समारंभापासून ते मानसपूजेपर्यंत विविध धार्मिक विधी करणारे हे कलाकार श्रीरामाच्या जीवन चरित्रातून प्रसृत झालेल्या दिव्य मूल्यांचा आपल्या जीवनावरील प्रभावाविषयी सांगत आहेत.
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पुष्पा ही व्यक्तिरेखा साकारणारी करुणा पांडे म्हणते, “राम नवमी एक असा सण आहे, जो तुमचे मन शांती आणि भक्तीने भरून टाकतो. श्रीरामाच्या जीवनातून आपल्याला धैर्य, लवचिकता आणि सद्वर्तनाचा धडा मिळतो. मला स्वतःला देखील हे गुण फार मौल्यवान वाटतात. मला आठवते आहे की, लहानपणी आम्ही घरचे रामचरितमानसचा पाठ करायचो आणि सगळे मिळून मंदिरात जायचो. त्या भक्तीच्या आणि आमच्या एकत्रपणाच्या आठवणी आजही माझ्यासोबत आहेत. प्रभू श्रीरामांची शिकवण हा नेहमीच माझासाठी प्रेरणास्रोत असतो, जो प्रत्येक संकटात मला मार्गदर्शन करतो. या रामनवमीस प्रत्येकाला आपल्या जीवनात प्रेम, सौहार्द आणि शक्तीचा लाभ होवो!”
‘वीर हनुमान’ मालिकेत अंजनीची भूमिका करणारी सायली साळुंखे म्हणते, “माझ्यासाठी, रामनवमी म्हणजे सद्गुणांवरील श्रद्धा आणि भक्तीचा सण. श्रीरामाचे आयुष्य अनेक संघर्षांनी भरलेले होते. पण त्यांची नीतीमत्ता कधीही ढळली नाही आणि स्वभावातील दयार्द्रता आटली नाही. मी लहान असताना आमच्या शेजारी भजन-कीर्तन असायचे आणि शोभा यात्रा निघायची, त्याची मी आतुरतेने वाट बघायचे. सर्व शेजारी पाजारी त्यात सामील होत असत. हा सण, परिस्थिती कितीही प्रतिकूल झाली तरी सद्वर्तनाच्या मार्गावर अढळ राहण्यासाठी प्रेरित करतो. या विशेष दिवशी मी सर्वांसाठी शक्ती आणि आनंदाची कामना करते.”
‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत राजेश वागलेची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणतो, “राम नवमी हा केवळ श्रीरामाच्या जन्माचा उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या दैनंदिन आयुष्यात श्रीरामाची मूल्ये अंगिकारण्याचे महत्त्व यात आहे. सत्य, विनम्रता आणि करुणा या गुणांमुळे हे जग अधिक सुंदर बनू शकते. श्रीराम हे याच सद्गुणांचे प्रतीक आहे. लहानपणी श्रीरामकथा मी टेलिव्हिजनवर बघायचो, त्यावेळी श्रीरामाची धर्मपरायणता पाहून अचंबित होऊन जायचो. हा सण सर्वांना स्वतःमधील सद्गुणांचा अंगिकार करण्याची शक्ती देवो हीच माझी श्रीरामचरणी प्रार्थना!”
‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत राधिका वागलेची भूमिका साकारणारी भारती आचरेकर म्हणते, “मी पारंपरिक मराठमोळ्या वातावरणात वाढले. आमच्या घरी हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा होत असे. माझी आई सूर्योदयाच्या आधी उठून पुरणपोळी आणि खीरीचा नैवेद्य बनवायची. मग आम्ही सगळे देवदर्शनासाठी मंदिरात जायचो. आजही माझ्या जीवनाच्या या टप्प्यावर रामरक्षा स्त्रोत्र म्हटल्याने माझ्या मनाला अपार शांती मिळते. हे स्त्रोत्र म्हणण्याची आमच्या घराण्याची परंपरा आहे. श्रीरामाचे धैर्य, सदाचार आणि क्षमाशील वृत्ती हे गुण आजच्या युगात देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. हा सण सर्वांच्या जीवनात सुजाणता आणि सौहार्द घेऊन येवो अशी मी कामना करते.”