
no images were found
‘अद्ययावत तंत्रज्ञानानुरूप अभियांत्रिकी शिक्षण राबवावे’
– युवराज मालोजीराजे छत्रपती
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थापित श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी या शाखेतील पदवी अभियांत्रिकी विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे होते. याप्रसंगी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) नवी दिल्लीचे अध्यक्ष डाॅ. प्रतापसिंह देसाई, आयएसटीई गोवा व महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष डाॅ. रणजीत सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
मालोजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक बोर्डिंग स्थापन केली, तो उद्देश या संस्थेतील शाखांत सफल होताना प्रकर्षाने दिसतोय आणि व्यावसायिक शिक्षणाच्या अधिक संधी ही संस्था उपलब्ध करत आहे याबद्दल विशेष आनंद होतोय. संस्थेचा विद्यार्थी म्हणून याचा सार्थ अभिमान वाटतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एनआयटीमध्ये विद्यार्थी घडण्यासाठी प्रयत्न व्हावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डाॅ. प्रतापसिंह देसाई म्हणाले, काॅलेजमधून निव्वळ पदवी प्राप्त विद्यार्थी न घडता तो तंत्रकुशल असायला पाहिजे. एनआयटी कोल्हापूरमध्ये अभियांत्रिकी शिक्षणासोबतच कौशल्य विकास कोर्सेस चालवले जातात, ही आशावादी बाब आहे. चारित्र्यवान व समाजभान असलेले अभियंते घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे ते म्हणाले.
अलिकडे संस्थेचा शाखाविस्तार वेगाने होत असताना प्रत्येक वर्षी नवीन शाखा निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत संस्थेच्या कोणत्याही कार्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याची ग्वाही आमदार आसगावकर यांनी दिली.
संस्थेचे विकास अधिकारी तथा एनआयटी प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात पदवी विभागाच्या मान्यता प्रक्रियेतील घडामोडी व अडचणी यासोबतच न्यू पाॅलिटेक्निक ते न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी या बदलाचा प्रवास आणि यातील कर्मचाऱ्यांचे अनमोल योगदान विशद केले.यावेळी पदवी विभागाच्या उभारणीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी पाटील यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजानीस वाय. एस. चव्हाण, सर्व संचालक, आजीव सेवक, सर्व शाखाप्रमुख, सर्व शाखांचे कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील व आभारप्रदर्शन डाॅ. नितीन पाटील यांनी केले. प्रा. शामली चव्हाण यांच्या सुरेल वंदेमातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.