
no images were found
हजारो शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग विरोधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
कोल्हापूर(प्रतिनिधी) : नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज, मंगळवारी कोल्हापुरातील हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला सरकारने १२ जुलै पर्यंत महामार्गाला स्थगिती नव्हे तर रद्दचा निर्णय घ्यावा अन्यथा महामार्ग रोको करु, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रात्रंदिवस रस्त्यावरुन हलणार नसल्याचा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चात जिल्ह्यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल होते. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुपारी साडे बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळेली झालेल्या सभेत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्य सरकारमधील मंत्री, आमदार शक्तीपीठ विरोधातील भूमिका घेत असताना प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांना नोटीसा कशा काढतात? या रस्त्यावर शेतकऱ्यांनी यापुर्वी हरकती नोंदवल्या होत्या, त्याची सुनावणी न घेता निर्णय घेणार असाल तर ते खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत एक इंचही जमीन रस्त्यासाठी देणार नाही, याची शपथ घेऊनच येथे घरी जाऊया. यावेळी उपस्थित नेत्यांनी मनोगत व्यक्त करताना आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मोर्चात खासदार शाहू महाराज छत्रपती,आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, गिरीश फोंडे समन्वयक, संजय बाबा घाटगे, भारत पाटणकर, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे, सम्राट मोरे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.