
no images were found
रविकिरण इंगवलेसह ठाकरे समर्थक ४० शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पान-सुपारीच्या मंडपासमोर दिलेल्या गद्दारीच्या घोषणा आणि शिवसेनेच्या गाण्यावर नाचलेल्याची सर्वत्र चर्चा असतानाच, आता क्षीरसागर गटांकडून इंगवले यांच्यासह राकेश माने, सोनू चौगलेचौगुले यांच्यासह ३०-४० कार्यकर्त्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षीरसागर गटाच्या माजी शहर संघटिका यांनी दिलेल्या तक्रारीनंतर काल रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत राजेश क्षीरसागर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रविकिरण इंगवले यांनीही संताप व्यक्त केला असून या प्रकारामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाद्वार रोड येथील गणपती मिरवणुकीत सहभागी मंडळांचे आणि अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी शिंदे गटात गेलेले माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने पान-सुपारीचे स्वागत मंडप घालण्यात आले होते. मात्र शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले. याचे पडसाद कोल्हापुरातील स्थानिक राजकारणात उमटले असून ठाकरे गटातील शिवसेना शहरप्रमुख रवि इंगवले आणि राजेश क्षीरसागर हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विसर्जन मिरवणुकीत इंगवले अध्यक्ष असलेल्या शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम तरुण मंडळाची मिरवणूक क्षीरसागर यांच्या मंडपसमोर आली असता, इंगवले यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्त्यांनी ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी करत शिवसेनेच्या गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे परिसरात प्रचंड तणावही निर्माण झाला होता.
यावेळी स्टेजवर शिंदे गटातील महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून दहशत माजवण्याच्या उद्देशाने आणि महिला पदाधिकारी स्टेजवर उपस्थितीत असल्याचे पाहून लज्जा उत्पन्न होईल, अशी आक्षेपार्ह भाषा वापरत हातवारे आणि शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी काल गुरुवारी सायंकाळी उशिरा इंगवले यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकाराबाबत राजेश क्षीरसागर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रविकिरण इंगवले यांनीही संताप व्यक्त केला असून या प्रकारामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.