
no images were found
वक्तृत्व, चित्रकला व निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
कोल्हापूर : 14व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त Nothing like Voting, I Vote for Sure ‘मतदानाइतकं अमूल्य नसे काही.. बजावू हमखास मताधिकार आम्ही’ हा विषय (Theme) आयोगाकडून देण्यात आला आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त वक्तृत्व, चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे सभागृह, विवेकानंद कॉलेज येथे साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झालेले प्रख्यात साहित्यिक कृष्णात खोत तसेच मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर, लेखिका सोनाली नवांगुळ व आंतरराष्ट्रीय धावपटू आसमा कुरणे यांच्यासह जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. सकाळी ९.३० वा. शिवाजी विद्यापीठ व राष्ट्रीय छात्रसेनेचे संचालक यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालय ते शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सभागृह, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर या मार्गावर विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार आहे.
महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी “लोकशाही बळकटीकरणासाठी मतदारांची भूमिका” हा विषय आहे. ही स्पर्धा महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर होणार असून स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. वक्तृत्व स्पर्धा नियम व अटीं – स्पर्धा महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राहील, स्पर्धेचा वेळ दहा मिनिटे राहील(८ + २), स्पर्धकांनी निःपक्षपातीपणे विषय मांडावयाचा आहे, स्पर्धा फक्त मराठी भाषेत होईल, व्यक्ती व राजकीय पक्षांचा उल्लेख टाळावा, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, स्पर्धकांनी ऑनलाईन पध्दतीने स्पर्धेत सहभागी व्हावयाचे आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्यामार्फत जिल्हा स्तरावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यासाठीचा विषय “मतदार जनजागृती” असा आहे. स्पर्धेमध्ये प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्यामार्फत जिल्हा स्तरावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यासाठीचे विषय (1) मतदान माझे आद्य कर्तव्य, (2) लोकशाहीचा राजा मतदार राजा (3) सुदृढ लोकशाहीसाठी मतदान हक्काचा वापर हे आहेत. स्पर्धेमध्ये प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमात उत्कृष्ट कामकाज केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.