
no images were found
मुलं जन्माला घालण्यापलिकडे आपण कोणता शोध – राज ठाकरे
गरज ही शोधाची जननी आहे. आपल्याकडे शोध इच्छेमुळे किंवा गरजेमुळे लागले. शास्त्रज्ञांचा आदर आपण केलाच पाहिजे. आजूबाजूला नजर टाकली तरीही लक्षात येईल की शोध म्हणजे काय? मोबाइल फोन आपल्या हाती आलाय. त्याचा शोध, टेलिफोनचा शोध कुणी लावला? दिव्याचा शोध कुणी लावला? या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत हव्या असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
आपण फक्त मुलं जन्माला घालण्याचा शोध लावला
“इतक्या शास्त्रज्ञांनी इतके चमत्कार आपल्या जगात घडवले आहेत. मात्र मी आजपर्यंत त्यांचं कधी होर्डिंग पाहिलं नाही. आमच्याकडे कोणतेही शोध न लावता.. आपण फक्त मुलांचा शोध लावला. होर्डिंगवर फोटो असतात मुन्नाचा वाढदिवस, अरे कोण मुन्ना? मुलं जन्माला घालण्यापलिकडे आपण कुठला शोध लावला?” असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे. मुंबईतल्या भाषणात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले शास्त्रज्ञ कधीही स्वतःचं होर्डिंग लावत नाहीत. ते त्यांचं काम करुन नामानिराळे होतात, जगाला भरभरुन देत असतात. अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. विज्ञान म्हटलं की आपल्याकडे फक्त रॉकेटचा विचार केला जातो. पण विज्ञानात पेनाच्या शोधापासून, चाकापासून अनेक शोध लागले. सगळ्या गोष्टींचं भान बाळगून आपण सगळ्या शास्त्रज्ञांचे आभार मानले पाहिजेत.
राज ठाकरे म्हणाले, संजय नाईक यांनी विज्ञान प्रकल्प स्पर्धेचं आयोजन केलंय असं समजल्यावर मला धक्काच बसला. पण नंतर त्यांनी या कार्यक्रमातील इतर मंडळीही दाखवली. मग माझा विश्वास बसला. पोरितोषिक स्वीकारताना मुलांमधील उत्साह क्रिकेट मॅचवेळेला पारितोषिके मिळतात त्यासारखा होता. विज्ञान विषयात पारितोषिके मिळवून विद्यार्थी उड्या मारत आहेत, हे पाहून मलाही आश्चर्य वाटलं.
“ठराविक संपादक, ठराविक काही राजकीय पुढारी असतात. सकाळपासून ते चॅनेलवर बोलायला सुरुवात करतात. त्यांना असं वाटतं की त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं. पण काही कळत नसतं, पण कॅमेरा समोर आला की बोलावं लागतं. त्याप्रमाणे मला काही सगळ्यातलं सगळं कळत नाही. शास्त्रातले पंडित येथे बसलेले आहेत, त्यामुळे मी फार बोलणार नाहीत”, अशी अप्रत्यक्ष टीकाही राज ठाकरे यांनी केली.