no images were found
राजारामपुरीत गणेश आगमन मिरवणुकीचा उत्साह : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते श्री गणेशाच्या आगमन सोहळ्याचे उद्घाटन
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात गणेश आगमन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शुभहस्ते गणेश आगमन मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गणरायाची विधिवत पूजा करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
गणेश आगमन सोहळ्यानिमित्त राजारामपुरी परिसरात नागरिक, गणेश मंडळांचे कार्यकर्ते तसेच तरुणाईमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आकर्षक लाईट इफेक्ट ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. विविध गणेश मंडळांनी आकर्षक सजावट व देखावे साकारत गणरायाचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी आमदार राजेश क्षीरसागर यांनी संवाद साधला. गणेशोत्सव हा कोल्हापूरच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, उत्सव साजरा करताना सामाजिक सलोखा, शिस्त आणि पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो. त्यामुळे गणेश मंडळांनी विधायक उपक्रम, सामाजिक प्रबोधन आणि समाजोपयोगी कार्यक्रमांना चालना द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी सतीश पोवार, कमलाकर जगदाळे, अंकुश निपाणीकर, दीपक चव्हाण, बाळासाहेब शेलार, धैर्यशील साळोखे, मंदार तपकीर, साहिल मुलाणी, ठोंबरे यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गणेश आगमन मिरवणुकीमुळे राजारामपुरी परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात गणरायाचे स्वागत करण्यात आल्याने संपूर्ण परिसर गणेशमय झाला होता.