Home संस्कृतिक आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

36 second read
0
0
4

no images were found

आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* आशा भोसले यांच्या ९३ व्या जन्मदिनानिमित्त संगीतकार ए. आर. रहमान यांनी तयार केलेल्या ‘आशा फॉरएव्हर’ गीताचे लोकार्पण

    मुंबई,: ज्येष्ठ गायिका आशा भोसले म्हणजे सळसळते चैतन्य होत्या. वयाच्या नव्वदीतही सादरीकरण करताना त्यांच्यातील ऊर्जा आणि जीवनाविषयीचे प्रेम प्रकर्षाने जाणवत असे. त्यांचा आवाज आणि त्यांची गाणी यापुढेही कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

          आशा भोसले यांच्या ९३ व्या जन्मदिनानिमित्त संगीतकार ए. आर. रहमान यांनी तयार केलेल्या ‘आशा फॉरएव्हर’ या गीताचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, संगीतकार ए. आर. रहमान, आशा भोसले यांची नात जनाई भोसले, भोसले कुटुंबीय, तसेच चित्रपट, संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आशाजींचे संपूर्ण आयुष्य हे आनंद, उत्साह आणि चैतन्याने भरलेले होते. ज्यांनी आपल्या स्वरांनी अनेक दशकांपासून रसिकांना आनंद दिला, त्यांच्या आठवणी आणि समृद्ध सांगीतिक वारसा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्याच भावनेतून तयार करण्यात आलेले ‘आशा फॉरएव्हर’ हे गीत त्यांना दिलेली सुंदर स्वरांजली आहे.

           “आशाजींचा आवाज ही कधीही न संपणारी अनुभूती आहे. जोपर्यंत त्यांची गाणी ऐकली जातील, तोपर्यंत त्या रसिकांच्या मनात कायम राहतील. त्यांच्या आठवणी जपण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन दरवर्षी व्हावे,” अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यांनी संगीतकार ए. आर. रहमान, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार आणि गीतनिर्मितीशी संबंधित संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.

            सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, आशा भोसले यांचे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाशी तसेच देश-विदेशातील संगीतप्रेमींशी अतूट नाते होते. त्यांनी मराठीसह विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये गाणी गायली. त्यांच्या स्वरांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून दिली.

           संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘आशा फॉरएव्हर’ हे गीत आशाजींना विनम्र अभिवादन असल्याचे सांगितले. “आशाजी या महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि संपूर्ण जगाच्या कन्या आहेत. त्यांचा आवाज आणि सांगीतिक वारसा सदैव जिवंत राहील,” असे ते म्हणाले.याप्रसंगी जनाई भोसले यांनी गीताच्या निर्मितीबाबत माहिती दिली .

            कार्यक्रमात ‘आशा फॉरएव्हर’ गीताचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून प्रकाशन (रिलीज) व दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र

सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र : राष्ट्रीय…