no images were found
आदर्श गणेशोत्सव म्हणून कोल्हापूरची ओळख व्हावी – आ. राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूरने नेहमीच राज्याला एक वेगळी ओळख दिली आहे. राज्य शासनाने गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्या – मुंबईच्या ऐवजी येथील गणेश उत्सव हा संपूर्ण राज्यात ‘ आदर्श गणेशोत्सव ‘ म्हणून ओळखला जावा अशी अपेक्षा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली .
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने लोकप्रतिनिधी,गणेश मंडळ पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच शांतता कमिटी सदस्य यांची गणेशोत्सव सन – 2026 अनुषंगाने सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड,पोलीस अधीक्षक निलोत्पल, शहर उपअधिक्षक प्रिया पाटील , करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले
अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. क्षीरसागर म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा कोल्हापूर जिल्ह्याने आजवर जपला आहे. नियमांचे पालन करणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. सर्व गणेश मंडळांनी पर्यावरण रक्षणासह विविध सामाजिक संदेशावर आधारित देखावे सादर करावेत. मंडळांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादा ओलांडली जाणार नाही, लेझरचा वापर होणार नाही याची दक्षता घेऊन तसेच कोणतेही गालबोट लागू न देता हा उत्सव आनंदाने – उत्साहाने साजरा करावा असे आवाहनही श्री. क्षीरसागर यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ राठोड म्हणाले, या उत्सवाद्वारे सामाजिक ऐक्याचा संदेश द्यावा.त्याचबरोबर गरिबांना आवश्यक ते सहाय्य करावे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करून नो डीजे, नो डॉल्बी , नो लेझर असा हा उत्सव सर्व कोल्हापूरवासीयांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा.असे सांगून गणपती मंडळाचे डिपॉझिट MSEB ने सात दिवसात परत करावे यासाठी त्यांना आदेशित करू असे सांगितले .
मनपा आयुक्त डॉ.भारूड म्हणाले,येत्या 14 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे.तोपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने शहरातील बहुतांशी खड्डे बुजवण्याला मनपा प्राधान्य देईल तसेच कोल्हापूरच्या या गणेशोत्सवाने राज्याला एक नवी दिशा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली .