no images were found
जन आरोग्य योजनेच्या लाभाबाबत रुग्णांमध्ये संभ्रम; सुरुवातीच्या उपचारांच्या बिलाबाबत हिंदू जनसंघर्ष समितीची चौकशीची मागणी
कोल्हापूर : जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात संबंधित रुग्ण योजनेस पात्र नसल्याचे सांगितले जाते. मात्र, काही दिवस उपचार झाल्यानंतर साधारणतः ५ ते ८ दिवसांनी रुग्ण योजनेस पात्र असल्याचे अथवा योजनेची मंजुरी मिळाल्याचे सांगितले जाते. या प्रक्रियेमुळे सामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत असून, आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास येत आहे.
विशेषतः रुग्ण योजनेस पात्र असल्यास, रुग्णालयात दाखल झाल्याच्या दिवसापासून योजनेचा लाभ मिळतो की मंजुरी मिळाल्याच्या दिवसापासून, याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे. सुरुवातीचे ५ ते ८ दिवसांचे उपचाराचे बिल नातेवाईकांकडून भरून घेतल्यानंतर योजना मंजूर झाल्यास त्या आधीच्या खर्चाचे काय होते, याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने जन आरोग्य अभियानाकडे ई-मेलद्वारे निवेदन करून या संपूर्ण प्रक्रियेबाबत अधिकृत स्पष्टीकरण व आवश्यक कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना त्याची योजनेतील पात्रता स्पष्टपणे तपासली जाते का? पात्र रुग्णाला योजनेची मंजुरी मिळण्यासाठी ५ ते ८ दिवसांचा कालावधी का लागतो? मंजुरीपूर्वी घेतलेल्या उपचाराच्या खर्चाबाबत शासनाचे नियम काय आहेत? तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर अनावश्यक आर्थिक भार पडू नये यासाठी संबंधित रुग्णालयांना कोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत, याबाबत स्पष्ट माहिती जनतेसमोर यावी, अशी मागणी समितीने केली आहे.
शासनाच्या आरोग्य योजनेचा उद्देश गरजू नागरिकांना उपचाराची आर्थिक मदत मिळवून देणे हा आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि पात्र रुग्णांना सुरुवातीपासूनच योग्य मार्गदर्शन मिळावे, अशी हिंदू जनसंघर्ष समितीची भूमिका आहे.
या विषयावर संबंधित विभागाने नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन रुग्णालयांच्या कार्यपद्धतीची तपासणी करावी आणि योजनेच्या लाभाबाबत स्पष्ट नियम व प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.