Home Uncategorized सहकारी बँकिंग तळागाळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा: महाव्यवस्थापक सर्वानन एम.

सहकारी बँकिंग तळागाळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा: महाव्यवस्थापक सर्वानन एम.

4 second read
0
0
21

no images were found

सहकारी बँकिंग तळागाळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा: महाव्यवस्थापक सर्वानन एम.

कोल्हापूर,(प्रतिनिधी): सहकारी बँकिंग क्षेत्र भारताच्या तळागाळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. ठेवीदांराचा विश्वास टिकवून ठेवणे आणि बँकेचे भविष्य सुरक्षित करणे हे मजबूत ट्रेझरी मॅनेजमेंट आणि पारदर्शक प्रशासन यांच्यावरच अवलंबून आहे, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पर्यवेक्षण विभागाचे महाव्यवस्थापक सर्वानन एम. यांनी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर डिस्ट्रीक्ट अर्बन बँक्स को-ऑपरेटीव्ह असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर आणि एसटीसीआय प्रायमरी डिलर्स लिमिटेड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवस्थापन विकास कार्यक्रमांतर्गत ‘फिक्स्ड इन्कम मार्केट्स इन इंडिया: करंट ट्रेंड्स, थीम्स अँड परस्पेक्टीव्हज् फॉर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वानन एम. बोलत होते.  कुलगुरू डॉ.राजनीश कामत अध्यक्षस्थानी होते.

महाव्यवस्थापक सर्वानन म्हणाले, गुंतवणूक धोरणाचे तंतोतंत पालन करणे, अंतर्गत लेखापरीक्षण मजबूत ठेवणे आणि आरबीआयच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे हे उच्च प्रशासनाचे मुख्य लक्षण आहे. देशामधील एकूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकांपैकी जास्तीत जास्त बँका महाराष्ट्रात आणि त्यातही कोल्हापूर परिक्षेत्रात विस्तारलेल्या आहेत. भारत सरकारच्या वित्तीय धोरणांमधील सकारात्मक बदल आणि रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे आज भारतीय फिक्स्ड इन्कम मार्केट एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभे आहे. गेल्या काही वर्षात भारतीय रोखे बाजार अधिक पारदर्शक आणि त़ंत्रज्ञानस्नेही झाला आहे. जागतिक घडामोडींमुळे बाँड यील्डमध्ये गतिमान बदल होत आहेत. यामध्ये आरबीआय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी केवळ वैधानिक तरलता प्रमाण पूर्ण करणे पुरेसे नाही, तर पोर्टफोलिओचे यिल्ड कसे वाढवता येईल, यावर भर देणे गरजेचे आहे. पारंपरिकरित्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांनी केवळ पैशांची बचत करणे पुरेसे नसून ॲक्टिव्ह पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. ठेवीदारांचा विश्वास आणि बँकेची नफाक्षमता वाढवण्यासाठी ट्रेझरी मॅनेजमेंटमधील ‘सुरक्षा, तरलता आणि परतावा’ या तिन्ही तत्त्वांचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. हा कार्यक्रम फिक्स्ड इन्कम मार्केटमधील जोखीम ओळखण्यासाठी आणि नवीन संधीचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ.राजनीश कामत म्हणाले, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या, लहान व्यापाऱ्यांच्या आणि तळागाळातील घटकांच्या आर्थिक गरजा भागवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. परंतु, आजचे बँकिंग केवळ ठेवी स्वीकारणे आणि कर्जे वाटणे यापुरते मर्यादित राहिलेले नाही. तंत्रज्ञान आणि बाजारातील साधने दिवसेंदिवस बदलत आहेत. या बदलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. बँकेच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे ही केवळ कायदेशीर गरज नसून आपल्या बँकेच्या सुरक्षिततेचे कवच आहे.

केंद्राचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. एसटीसीआय संशोधन विभागाचे प्रमुख आदित्य व्यास यांनी आभार मानले. यावेळी आरबीआय (मुंबई)चे सहाय्यक महाव्यवस्थापक निलेश गावडे, उपाध्यक्ष आणि एसटीसीआयच्या प्रमुख संध्या शशी, एसटीसीआयचे सहाय्यक उपाध्यक्ष गुरूदत्त कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी बँकांमधील व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

रंकाळ्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसाठी नऊ कोटींचे कॉऊनॉमिक्स तंत्रज्ञान, चार टप्प्यात होणार काम

रंकाळ्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसाठी नऊ कोटींचे कॉऊनॉमिक्स तंत्रज्ञान, चार टप्प्यात होणार …